भटकळ येथे अन्नभाग्य योजनेतील तांदूळ जप्त
कारवार : सरकारी अन्नभाग्य योजनेतील रेशनकार्डवर वितरीत करण्यात येणाऱ्या तांदळाची कंटेनरमधून होत असलेल्या चोरट्या वाहतूक प्रकरणी भटकळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कंटेनरमधून 3 लाख 23 हजार रुपये किंमतीचा 9 हजार 500 किलो तांदूळ प्लास्टिकच्या पोत्यामधून वाहतूक करण्यात येत होती. ही कारवाई भटकळ येथील नूर मशिदीजवळ राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 66 वर करण्यात आली. या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींची नावे मोहम्मद समीर (रा.भटकळ) आणि प्रवीण एस. आर. (वय 28, रा. नरसीनकोप्प, जिल्हा हासन) अशी आहेत. प्रवीण हा कंटेनरचा चालक आहे.
या प्रकरणाबद्दल समजलेली अधिक माहिती अशी, भटकळचे आहार निरीक्षक उदय द्यामप्पा तळवार व भटकळचे डीवायएसपी महेश के. एम. यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे कंटेनरची तपासणी केली असता सरकारी अन्नभाग्य योजनेअंतर्गत गरिबांना रेशनकार्डवर वितरीत करण्यात येणारा 3 लाख 23 हजार रुपये किंमतीचा 1 हजार 500 किलो तांदूळ आढळून आला. आहार निरीक्षक उदय तळवार यांनी रीतसर तक्रार दाखल केल्यानंतर भटकळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नवीन नाईक यांनी घटनास्थळी दाखल होऊन कंटेनरसह दोन व्यक्तींना ताब्यात घेतले. आणि तांदूळ व कंटेनर जप्त केला. भटकळ पोलीस या प्रकरणाचा पर्दापाश करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.