अनगोळ येथील ‘त्या’ रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करा
परिसरात धुळीचे साम्राज्य पसरत असल्याने स्थानिक नागरिकांची मागणी
बेळगाव : अनगोळ, ध. संभाजी चौक ते रघुनाथ पेठ, हनुमान मंदिरापर्यंतच्या रस्त्यावर नवीन ड्रेनेज पाईप लाईन घालण्यासाठी खोदाई करण्यात आली होती. ते काम संपले असून चरी बुजविण्यात आल्या आहेत. मात्र त्यानंतर रस्ताच करण्यात आला नसल्याने या परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले असून या रस्त्यावर लहान मोठे अपघात घडत आहेत. तेव्हा तातडीने या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे. अनगोळ येथे गेल्या वर्षभरापासून विविध ठिकाणी नवीन ड्रेनेज पाईप लाईन घालण्याचे काम करण्यात आले होते. हे काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर त्या रस्त्याचे डांबरीकरण करणे गरजेचे होते. मात्र अनेक रस्त्यांचे डांबरीकरणच केले गेले नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. साहजिकच अपघाताला वाव मिळत आहे. तेव्हा पावसाळ्यापूर्वी तातडीने या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे.
डांबरीकरण न केल्यास आंदोलन
रघुनाथपेठ, हनुमान मंदिरसमोरील रस्ता तर अवघा काही फुटाचाच शिल्लक ठेवण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावरील बस वाहतूकही सुरळीत झाली आहे. मात्र या अर्धवट कामांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अपघात घडत असल्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत धरुनच वाहने चालवावी लागत आहेत. तेव्हा संबंधित विभागाने याकडे लक्ष देवून रस्त्याचे डांबरीकरण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे.