तक्रार केल्यानंतर ड्रेनेज चेंबरची दुरुस्ती
आता तरी स्वच्छ पाणीपुरवठा होणार का?
बेळगाव : वडगाव येथील रयत गल्ली तसेच परिसरात गेल्या महिन्याभरापासून ड्रेनेजमिश्रित पाणी नळाला येत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. याबाबत एलअॅण्डटी कंपनीला आणि महानगरपालिकेला कळविण्यात आले. तरी देखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. याबाबत महानगरपालिकेसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दोन दिवसांपूर्वी देण्यात आला होता. त्यामुळे या परिसरातील ड्रेनेज चेंबर महानगरपालिकेने स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्य पाईपलाईनमधूनच हे पाणी मिश्रित होत आहे. त्यामुळे मुख्य पाण्याची पाईपलाईन कोठे तरी फुटली असणार. त्याची तपासणी करा, अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र सध्या केवळ ड्रेनेज चेंबरची सफाई केली गेली आहे. जर यानंतरही पाणी दूषितच आले तर मुख्य पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपमध्ये कॅमेरा सोडून तपासणी केली जाईल, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. रयत गल्ली यासह परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाणी दूषित येत आहे. विहिरींनाही गटारी तसेच ड्रेनेजमिश्रीत पाणी येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. याबाबत अनेकवेळा कळविण्यात आले. मात्र त्याकडे दुर्लक्षच झाले आहे.आता रयत गल्ली येथील चेंबरची दुरुस्ती केली तरी ड्रेनेजच्या पाण्याचा निचरा पुढे योग्य प्रकारे होणार का? हे पहावे लागणार आहे.