शहरातील बसथांबे त्वरित दुरुस्त करा
निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : शहरातील बसथांब्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या बसथांब्यांना गळती लागून प्रवाशांची गैरसोय झाली आहे. सदर बसथांबे त्वरित दुरुस्त करून प्रवाशांसाठी सुसज्ज बसथांबे निर्माण करून देण्यात यावेत, अशा मागणीचे निवेदन संतोष दरेकर यांच्याकडून निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांना देण्यात आले. शहरातील महत्त्वाच्या रस्त्यावरील बहुतांश बसथांब्यांना गळती लागली आहे. निर्माण करण्यात आलेले बसथांबे कुचकामी ठरले आहेत. अनेक ठिकाणी बसथांब्यातून आसने गायब झाली आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली असून सदर बसथांब्यांची झालेली दुरवस्था लक्षात घेऊन प्रशासनाने बसथांबे दुरुस्त करावे. पावसामध्ये प्रवासी, विद्यार्थ्यांना बसथांब्यात थांबणे अशक्य ठरत आहे. या बसथांब्यांकडे संबंधित अधिकाऱ्यांनी साफ दुर्लक्ष केले आहे. पाण्यासारखा पैसा खर्च करूनही तो वाया गेला आहे. याची त्वरित दखल घेऊन कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.