आचारसंहिता हटविल्याने सरकारी कार्यालये गजबजली
सरकारी अधिकारी पूर्वीच्या पदांवर होताहेत रुजू : कामासाठी नागरिकांची वाढली वर्दळ
बेळगाव : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता दि. 6 रोजी पूर्ण झाली असून सरकारी कार्यालयांमध्ये नागरिकांची वर्दळ वाढली आहे. तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील गेल्या दोन महिन्यांपासून मोकळा श्वास घेतलेल्या पार्किंगमध्ये वाहनांची गर्दी वाढल्याचे सोमवारी दिसून आले. लोकसभा निवडणुकीची घोषणा गेल्या 16 मार्च रोजी जाहीर करण्यात आली होती. तेंव्हापासून आचारसंहिता जारी करण्यात आली होती. सात टप्प्यामध्ये देशभरात लोकसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या आहेत. दि. 4 जून रोजी मतमोजणी झाल्यानंतर दि. 6 जून रोजी आचारसंहिता प्रक्रिया पूर्ण झाली. त्यामुळे जवळपास अडीच महिन्याच्या कालावधीनंतर सरकारी कामांना गती मिळाली आहे. बहुतांश अधिकारी निवडणूक कामासाठी गेल्याने नागरिकांची अनेक कामे खोळंबली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या इतरत्र बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रशासकीय कामांमध्ये अडथळा निर्माण झाला होता. दि. 6 जून रोजी आचारसंहिता पूर्ण झाली असून अनेक सरकारी अधिकारी पूर्वीच्या पदांवर रुजू होत आहेत. त्यामुळे सरकारी कार्यालयांमध्ये नागरिकांची वर्दळ वाढली आहे. खोळंबलेली सरकारी कामे पूर्ण करुन घेण्यासाठी नागरिकांनी सरकारी कार्यालयात गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील पार्किंगमध्ये वाहनांची गर्दी दिसून आली. वाढलेल्या गर्दीमुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे सरकारी कार्यालये जवळपास अडीच महिन्यानंतर गजबजल्याचे दिसले.