‘कर्तव्य अन् कर्जा’ची करून दिली आठवण
वृत्तसंस्था/ मधुबनी
बिहारमध्ये जनसुराज पदयात्रा करत असलेल्या प्रशांत किशोर यांनी मंगळवारी पुन्हा एकदा लोकांना जागरुक करण्याचा प्रयत्न केला आहे. बिहारला सर्वाधिक उपासमारी आणि बेरोजगारी असलेले राज्य ठरवत त्यांनी ‘कर्तव्य आणि कर्जा’ची आठवण करून दिली आहे. लोकांना रोजगार आणि चांगले शिक्षण मिळवून न देऊ शकणाऱ्या नेत्यांना झाडूने मारून हाकलून लावा, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.
बिहार हे राज्य देशात सर्वात मागास आहे. सर्वाधिक उपासमारी आणि बेरोजगारी बिहारमध्येच आहे. तरीही येथील लोकांचे डोळे उघडायला तयार नाहीत. याचमुळे सर्वसामान्यांना आणि त्यांच्या मुलाबाळांना भोगावे लागत आहे. स्वत:चे घरदार सोडून स्वत:चे कर्तव्य मानून लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी पदयात्रा काढत आहे. देवाने आम्हाला दिलेली शक्ती-बुद्धी म्हणजे या मातीचे कर्ज असल्याचे उद्गार प्रशांत किशोर यांनी काढले आहेत.
किमान एकदा तरी प्रयत्न करून पहा, गावोगावी जावा, स्वत:साठी नव्हे तर स्वत:च्या मुलाबाळांसाठी जागरुक व्हा. आताच जागरुक झाला नाही तर याच अवस्थेत जीवन संपून जाईल हे सांगण्यासाठीच येथे आलो असल्याचे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.
लोकांच्या मताची किंमत नाला-गल्ली नाही. तुमच्या मताची किंमत 4 किलो धान्य देखील नाही. तुमच्या मताची किंमत ही तुमच्या मुलांना रोजगार आणि शिक्षण मिळवून देणे आहे. याहून कमी मूल्यात व्यवहार केल्यास कधीच गरीबीतून बाहेर पडू शकणार नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे.