भोमातील चार घरांचे पुनर्वसन,मंदिरांना कोणताही धोका नाही
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे भोम ग्रामस्थांना आश्वासन
पणजी : राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम करताना भोम गावातून फ्लायओव्हर करू नये, या मागणीसाठी भोमवासियांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची शनिवारी भेट घेतली होती. या पार्श्वभूमीवर काल सोमवारी पुन्हा मुख्यमंत्री सावंत यांनी भोमवासियांशी चर्चा करण्यासाठी त्यांना मंत्रालयात वेळ दिली होती.या बैठकीत तांत्रिक समितीमार्फत महामार्ग प्रकल्पाचा सविस्तर आराखडा ग्रामस्थांसमोर ठेवण्यात आला. तसेच त्याचे सादरीकरणही करून दाखवले. या सादरीकरणात आणि प्रस्तावित आराखड्यात केवळ चार घरांना फटका बसणार असल्याचे सांगण्यात आले. या चारही घरांना पूर्णपणे भरपाई देण्याबरोबरच त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. भोम गावातील कोणत्याही धार्मिक स्थळाला धक्का पोहोचणार नाही, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी शिष्टमंडळाला सांगितले.
आज होणार प्रत्यक्ष पाहणी
शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतरही राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम करताना भोम गावातून फ्लायओव्हर करू नये, अशी मागणी केली आहे. या प्रकल्पाबाबत ग्रामस्थांमध्ये अजूनही गैरसमज आहे. हा गैरसमज दूर करण्यासाठी आज मंगळवारी अभियंते प्रत्यक्ष गावात जाऊन ग्रामस्थांसमक्ष मोजमाप करतील. त्यामुळे कोणाचेही नुकसान न होता रस्त्याचे काम पार पडेल, असा आशावादही अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
फ्लाय ओव्हर नकोच
तांत्रिक समितीने शिष्टमंडळाला आराखडा सादरीकरण दाखवले. त्यानंतरही ग्रामस्थांनी आपली भूमिका न बदलता आम्हाला फ्लायओव्हर नकोच, आम्हाला बायपासच हवा, अशी मागणी केली. अभियंते चुकीची माहिती देऊन दिशाभूल करीत असल्याचाही पवित्रा भोमवासीयांनी घेतला आहे. प्रत्यक्ष मोजमाप हे ग्रामस्थांच्या समोरच करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या शंका व गैरसमज दूर होईल, असे अभियंत्यांमार्फत सांगण्यात आले आहे. परंतु ग्रामस्थांचा विरोध कायम असल्याने प्रशासन व नागरिकांमध्ये समन्वय साधणे हेच सध्या सरकारसमोरील मुख्य आव्हान ठरले आहे.
नकाशात वस्तुस्थिती स्पष्ट नाही
अभियंत्यांनी सादर केलेल्या नकाशात वस्तुस्थितीची स्पष्ट माहिती दिलेली नाही. प्रत्यक्षात रस्ता मंदिराजवळूनच जाणार आहे. त्यामुळे निश्चितच धार्मिक स्थळांना धोका निर्माण होणार आहे. गावाच्या मध्यातून जाणाऱ्या महामार्गामुळे शाळा, बाजारपेठ व ऐतिहासिक वारसास्थळांवरही परिणाम होणार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
भोमवासीयांबाबत मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील
भोम गावातून प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वाद मिटविण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे सक्षम आहेत. केंद्र सरकारचा हा प्रकल्प असला तरी, राज्याच्या हिताच्यादृष्टीने मुख्यमंत्री सावंत हे स्वतंत्रपणे निर्णय घेतील. मुख्यमंत्री सावंत यांनी भोम वासीयांच्या सर्व घरांना धोका नसल्याचे सांगितल्याने ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी राहणे गरजेचे आहे. कारण भाजप पक्ष विकास करताना जनतेला कोणत्याच प्रकारे त्रास होऊ नये, यासाठी कायम लोकांच्या बाजूनेच भूमिका घेत आलेले आहे, असे राज्यसभा खासदार सदानंद तानावडे यांनी दै. ‘तऊण भारत’शी बोलताना सांगितले. भोम येथील राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणामुळे त्याचा लाभ असंख्य लोकांना होणार आहे. भोम येथे प्रत्यक्षात 40 घरांना धोका आहे, असे लोक बोलत असले तरी त्यांच्यामध्ये संभ्रम पसरविण्याचे काम काही लोक करीत आहेत. मुख्यमंत्री सावंत यांनी 40 घरांना नव्हे, केवळ 4 घरांना धोका पोहचणार असल्याचे स्पष्ट सांगितले आहे. ज्या घरांना धोका आहे, त्यांना सरकार सर्वतोपरी मदत देणार आहेच. त्यामुळे भोमवासीयांनी संभ्रम पसरविण्याऱ्या लोकांवर विश्वास न ठेवता प्रत्यक्षात वस्तुस्थिती समजून घ्यायला हवी. हे चौपदरीकरण 60 मीटरचे नसून, केवळ 25 मीटर इतकेच होणार आहे.