खासगी बँक कर्मचाऱ्यांच्या नोकरी सोडण्याच्या प्रमाणात घट
देशांतर्गत खासगी बँकांमधील कर्मचाऱ्यांच्या नोकरी सोडून जाण्याचे प्रमाण आणि टक्केवारी यामध्ये 2024 मध्ये घट झाल्याचे स्पष्ट झाले असून ही बाब खासगी बँका आणि त्यांच्या व्यवस्थापन यांच्यासाठी निश्चितच समाधानकारक आहे. यासंदर्भात प्रकाशित केलेल्या प्राथमिक अहवालानुसार देशातील खासगी क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांचे नोकरी सोडून जाण्याचे प्रमाण जे 2023 मध्ये 51 टक्के होते ते 2024 मध्ये 35 टक्क्यावर आले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने खासगी बँकांमधील कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील या स्थित्यंतराची नोंद घेतली आहे हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.
यासंदर्भात प्रामुख्याने व आकडेवारीसह नमूद करायचे म्हणजे खासगी क्षेत्रातील प्रमुख अशा एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, बंधन बँक, इंडसइंड बँक, आरबीएल बँक या बँकांमध्ये सुमारे 6,30,000 कर्मचारी कार्यरत असून त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या नोकरी सोडून जाण्याच्या प्रमाणात घट झाली असून त्याचेच प्रत्यंतर यासंदर्भातील अहवालात दिसून आले. या संदर्भातील संस्था व आकडेवारीसह सांगायचे म्हणजे वर नमूद केलेल्या खासगी क्षेत्रातील मोठ्या व प्रमुख बँकांपैकी अशा एचडीएफसी बँकेतील कर्मचाऱ्यांच्या राजीनाम्याची टक्केवारी 2023 मध्ये 34 टक्के होती तर 2024 मध्ये हीच टक्केवारी 26 टक्केवर आली. आयसीआयसी बँकेतील हीच टक्केवारी क्रमश: 30 टक्क्यांहून 24 टक्क्यांवर तर खासगी क्षेत्रातीलच तुलनात्मक बँक समजल्या जाणाऱ्या कोटक महिंद्रा बँकेतील कर्मचाऱ्यांचे प्रमाण 45 टक्क्यांहून 39 टक्क्यावर आले. त्यातही पण विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे आघाडीच्या 6 खासगी बँकांमध्ये इंडसइंड बँकेतील कर्मचारी नोकरी सोडून जाण्याचे प्रमाण व संख्येमध्ये विशेष उल्लेखनीय म्हणजे 36 टक्के एवढी घट 2024 मध्ये दिसून आली.
यासंदर्भात जाणकारांच्या मतानुसार प्रमुख खासगी बँकांमधील कर्मचाऱ्यांचे नोकरी सोडून जाणे म्हणजेच त्यांच्या गळतीच्या संदर्भात गेल्या वर्षभरात झालेल्या प्रगतीच्या संदर्भात जाणकारांच्या मते यासंदर्भात संबंधित बँकांनी वाढता व्यवसाय, वाढती व्यावसायिक स्पर्धा, अनुभवी व कौशल्यपूर्ण कर्मचाऱ्यांची कमतरता, खासगी सहकारीच नव्हे तर सरकारी बँकांकडून मोठ्या प्रमाणावर होणारी कर्मचारी अधिकारी पदांवरील भरती या विविध कारणांमुळे होणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी घेतलेले प्रयत्न व केलेली उपाययोजना ही प्रमुख कारणे होत. याचेच दृश्य व सकारात्मक परिणाम खासगी बँकांच्या नोकरी सोडून जाण्याच्या प्रयत्नांमध्ये झालेली घट या स्वरुपात दिसून येतात.
एचआर व्यवस्थापन क्षेत्रातील विख्यात अशा डिलॉईट इंडियाचे विषय तज्ञ प्रखर त्रिपाठी यांच्या मते आपल्याकडील खासगी बँकांनी आपल्या कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी धोरणात्मक स्वरुपाचे व विशेष प्रयत्न केले. यामध्ये प्रामुख्याने या बँक कर्मचाऱ्यांचे राजीनाम्याचे म्हणजेच नोकरी सोडून जाण्याची कारणे तपशिलवार जाणून घेण्यात आली. त्यावर विचार विश्लेषण करण्यात आले. संबंधित-कर्मचारी अधिकारी व व्यवस्थापक-व्यवस्थापन इ.शी चर्चा करण्यात आली व या साऱ्यांच्या अनुषंगाने व कारणमिमांसा करून कारवाई करण्यात आली.
यामध्ये प्रामुख्याने भर देण्यात आला तो कर्मचाऱ्यांचे कामकाज व करिअर यांची सांगड घालण्यावर. त्यातून नेहमीच व चाकोरीबद्ध कामाशिवाय विशेष प्रयत्न, कल्पकतेसह व कामाच्या गरजांची व्यावसायिकदृष्ट्या विहित स्वरुपात व ठरल्यावेळेत म्हणजेच चांगले व प्रभावी स्वरुपात काम करणाऱ्यांना अंतर्गत बढतीच्या संधी उपलब्ध केल्या जाऊ लागल्या. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा बढती, पदोन्नती, अधिक दर्जेदार व वेगळे काम यासारख्या महत्त्वाच्या आशा-अपेक्षांची पूर्तता व्हायला लागली. उत्तम काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसह पद-पगार यामध्येदेखील वाढ मिळू लागली.
कर्मचाऱ्यांशी संबंधित अशा या महत्त्वपूर्ण व जिव्हाळ्याच्या मुद्यांना बँकांनी व्यक्तिगत सोय व व्यावसायिक निकड यांची भक्कम जोड दिली. बऱ्याच कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक व कौटुंबिक कारणांपोटी बदली हवी असते. विशेषत: मध्यमवयीन म्हणजेच अनुभवी कर्मचाऱ्यांना मुलांचे शिक्षण, अन्य जबाबदाऱ्या व कौटुंबिक गरजांपोटी विशिष्ट ठिकाणी बदली हवी असते. त्यासाठी प्रसंगी त्यांच्या अन्य अपेक्षा नसतात. यासाठी खासगी बँकांमध्ये लवचिक व्यावहारिक व पद्धत नव्हती. त्यामुळे या कारणामुळे सुद्धा कर्मचारी नोकरी सोडून जाऊ लागले. त्यावर तोडगा म्हणून या बँकांनी प्राधान्य तत्वावर धोरण निश्चित करून त्याची अंमलबजावणी सुरु केली व त्याचे सकारात्मक परिणाम दिसायला लागले.
संबंधित खासगी बँकांनी कर्मचारी गळतीवर गंभीरपणे व तातडीने उपाययोजना केल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले. उदाहरणार्थ कर्मचाऱ्यांच्या सोडून जाणाऱ्यांच्या संख्या आणि राजीनाम्याच्या कारणांचे विवेचन-विश्लेषण करताना प्रामुख्याने लक्षात आलेली बाब म्हणजे खासगी बँकांमध्ये नव्याने रुजू झालेल्या व त्यातही पण 3 ते 6 महिने म्हणजे सुरुवातीची सेवा करणाऱ्यांचे नोकरी सोडून जाण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले.
बँकेच्या सेवेत नव्याने येणाऱ्यांचे मोठे प्रमाण लक्षात घेता त्यांच्या विशेष अपेक्षा वा गरजा व त्यापोटी राजीनामा देण्याच्या कारणांवर तोडगा स्वरुपात या नव्या कर्मचाऱ्यांना रुजू झाल्यावर स्थिरावण्यासाठी विचार करून विशेष उपाययोजना या बँकांनी सुरु केली. यामध्ये बँकांमध्ये नव्याने आलेल्या व अननुभवी कर्मचाऱ्यांसाठी अधिक माहितीपर आणि मार्गदर्शक सत्रांचे आयोजन सुरुवातीच्या काळातील त्यांच्या समस्यांचे निराकरण, बँकेच्या कार्यपद्धतीशी नेमका परिचय, शंकानिरसन, विशेष चर्चेसाठी वा मार्गदर्शनासाठी बँकेचे अधिकारी-व्यवस्थापकांशी थेट संवाद इ. उपक्रमांचे आयोजन करून त्यांची आग्रहपूर्वक अंमलबजावणी सुरु करण्यात आली.
याशिवाय खास नव्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांचा बँक, बँकेचे कामकाज व व्यवस्थापन, संवाद, संभाषण कौशल्य, ग्राहक संपर्काचे महत्त्व, कामकाजातील आत्मविश्वास व बँकिंगमधील करिअर व भविष्यकालीन संधी इ. बदल विशेष मार्गदर्शक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या विशेष प्रयत्नांचा विशिष्ट कालावधीनंतर कानोसा घेण्यात येऊन त्यानुसार योजनापूर्वक प्रयत्न करण्यात आले. याचे सकारात्मक परिणाम होऊन नव्या कर्मचाऱ्यांच्या बँकेची नोकरी काही महिन्यातच सोडून देण्याच्या प्रकारांवर नियंत्रण मिळविले गेले हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.
खासगी बँकांमधील कर्मचाऱ्यांच्या राजीनाम्याचे वाढते प्रमाण व टक्केवारी या संदर्भात नमूद करण्यासारखी अन्य बाब म्हणजे 2022-23 या आर्थिक वर्षात बँका व वित्तीय संस्थांचा व्यवसाय आणि शाखा या दोन्हीमध्ये लक्षणीय वाढ झाली होती व त्यापोटी कर्मचाऱ्यांची सुद्धा मोठी उलाढाल होणे अपरिहार्य होते, असे अभ्यासपूर्ण मत आशिका स्टॉक ब्रोकिंगचे मुख्याधिकारी आशुतोष मिश्रा यांनी व्यक्त केले असून त्यामध्ये बरेच तथ्य आहे. या सध्या पार्श्वभूमीवर केलेल्या नव्या सर्वेक्षणानुसार सर्वेक्षणात सहभागी झालेल्या एचडीएफसी, आयसीआयसीआय, अॅक्सिस, कोटक महिंद्रा व आरबीएल या साऱ्या बँकांनी एका मर्यादेबाहेर म्हणजेच मोठ्या संख्येत कर्मचारी सोडून जाण्याने त्याचा विपरित परिणाम बँकांच्या व्यवसायावर होतो ही बाब प्रांजळपणे मान्य केली. त्यानुसार उपाययोजना व त्यांच्या मागोव्यावर भर देण्याचे ठरविले आहे. याचाच एक दृश्य परिणाम म्हणजे गेल्या सहा महिन्यात खासगी बँकांमधील कर्मचाऱ्यांची गळती सुमारे 10 टक्क्यांनी कमी झाल्याचा सकारात्मक प्रतिसाद दिसून आला आहे.
- दत्तात्रय आंबुलकर