सर्व्हर समस्येमुळे रेशनकार्डधारक हैराण
बेळगाव : नोव्हेंबर महिन्यातील रेशन वितरणाला शनिवार दि. 22 पासून सुरुवात झाली आहे. मात्र उशिराने रेशन वितरण सुरू झाल्याने अनेक ठिकाणी सर्व्हर समस्या निर्माण झाली आहे. परिणामी रेशन कार्डधारकांना दुकानाबाहेर तासनतास ताटकळत बसावे लागत आहे. याचा नाहक त्रास रेशनदुकानदारांनाही सहन करण्याची वेळ आली आहे. राज्य सरकारच्या अन्नभाग्य योजनेंतर्गत प्रतिमाणसी 5 किलो तर राज्य सरकारकडून 5 किलो असा एकूण दरमहा 10 किलो तांदूळ दिला जात आहे. मात्र, राज्य सरकारकडून केंद्र सरकारला 5 किलो तांदळाची रक्कम देण्यास चालू महिन्यात विलंब करण्यात आला.
इतकेच नव्हे तर रेशनदुकानदारांचे कमिशन गेल्या 7 महिन्यांपासून थकविण्यात आले आहे. त्यातच पुढील महिन्यापासून रेशन दुकानदारांची कमिशनची रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा करण्याऐवजी जिल्हा पंचायतीला जमा केली जाणार आहे. या सर्व कारणांमुळे नोव्हेंबर महिन्यात रेशन वितरण करण्यास विलंब झाला. दर महिन्यात 16 तारखेच्याआधी रेशन वितरण जवळजवळ पूर्ण होते. मात्र, चालू महिन्यात 23 तारीख उलटून गेली तरी 60 टक्के रेशन वितरण झालेले नाही. नोव्हेंबरपर्यंत रेशन वितरण पूर्ण होणे गरजेचे आहे. मात्र सर्वच समस्या उद्भवत असल्याने रेशन कार्डधारक त्रस्त बनले आहेत. रेशन कार्डधारकांना तासनतास दुकानाबाहेर थांबावे लागत आहे.
वरिष्ठांकडून सर्व्हर समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन
जिल्ह्यात रेशन वितरण करताना सर्व्हर समस्या निर्माण होत असल्याने त्याची माहिती वरिष्ठांना कळविण्यात आली आहे. सर्व्हर समस्या मार्गी लावली जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. यावेळी रेशन वितरणास विलंब झाल्याने रेशन कार्डधारकांना समस्या निर्माण झाली आहे.
-मल्लिकार्जुन नायक, उपसंचालक आहार व नागरी पुरवठा खाते