राणी चन्नम्मा यांचे जीवनकार्य आदर्शवत
जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी : काकती येथे राणी चन्नम्मा विजयोत्सव उत्साहात
वार्ताहर/काकती
कर्नाटकच्या इतिहासात राणी चन्नम्मा यांचे जीवनकार्य आदर्शवत आहे. प्रत्येकाने ते समजावून घेवून घरोघरी जागृती करणे गरजेचे आहे. राणींच्या या जन्मगावामुळे काकतीला एक वेगळा इतिहास आहे. काकती गावची अनेक विकासकामे केली असून यापुढेही करणार असल्याचे आश्वासन जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिले. राणी चन्नम्मा विजयोत्सव बुधवारी काकती येथे जिल्हा प्रशासनाच्यावतीने थाटात साजरा झाला. मुक्तीमठाचे सोमेश्वर शिवाचार्य महास्वामी, उदय हिरेमठ स्वामी यांचे सानिध्य लाभले.
अध्यक्षस्थानी ग्रा. पं. अध्यक्षा वर्षा मुचंडीकर होत्या. दीपप्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले. नाडगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्वागत व प्रास्ताविक प्रांताधिकारी श्रवण नायक यांनी केले. व्यासपीठावर उत्तर विभागाचे आमदार राजू सेठ, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, तहसीलदार बसवराज नागराजू, उपतहसीलदार सदाशिव साळुंखे, माजी जि. पं. उपाध्यक्ष अरुण कटांबले, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, ग्रा. पं. उपाध्यक्षा रेणुका कोळी, माजी उत्सव समितीचे पदाधिकारी डॉ. अशोक स्वामी हिरेमठ, पीडीओ अरुण नाथबुवा उपस्थित होते.
काकतीच्या विकासासाठी राज्य सरकार व कित्तूर चन्नम्मा प्राधिकरण प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याचे मंत्री जारकीहोळी यांनी सांगितले. डॉ. गुरुदेवी हुलेप्पण्णावरमठ यांनी राणी चन्नम्मा यांचे कार्य स्त्रियांचा सन्मान वाढविणारे आहे, असे सांगितले. माजी ता. पं. सदस्य यल्लाप्पा कोळेकर यांनीही समयोचित विचार मांडले. माजी जि. पं. सदस्य सिद्दगौडा सुणगार यांनी, मंत्री जारकीहोळी यांनी दीड कोटीचा निधी मंजूर केला असून त्यातील किल्ल्याच्या रस्त्यासाठी 75 लाख, उद्यानासाठी 50 लाख, देसाई गल्ली प्रमुख प्रवेशद्वार येथे स्वागत कमानीसाठी 25 लाख रुपयांचा निधी असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.
विविध मागण्या
डॉ. एस. डी. पाटील यांनी राणी चन्नम्मा यांचा आदर्श ठेवण्यासाठी सांबरा विमानतळाला राणी चन्नम्मा विमानतळ नाव देण्याची मागणी केली. तर सिद्दगौडा सुणगार यांनी राष्ट्रीय महामार्ग काकतीला उ•ाण रस्ता व सर्व्हिस रस्त्याची मागणी केली. सिद्धेश्वर देवस्थान पंच मंडळीच्यावतीने मंत्री जारकीहोळी यांचा विशेष सत्कार देवस्थानचे उपाध्यक्ष शिवाजी नरेगवी यांनी केला. तसेच कर्नाटक अलवू प्रतिकेच्यावतीनेही त्यांचा सत्कार करण्यात आला. देसाई घराण्याचे वारसदार बाबासाहेब देसाई यांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सकाळी 9.15 वाजता मंत्री जारकीहोळी, आमदार राजू सेठ यांच्या हस्ते बलून व कबूतर आकाशात सोडून विजयोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच बैलहोंगल येथून आणलेल्या वीरज्योतीचे स्वागत करण्यात आले.
राष्ट्रीय महामार्ग सर्व्हिस रस्ता गावच्या प्रवेशद्वारातून विजयोत्सव मिरवणुकीला सुरुवात झाली. या मिरवणुकीत राणी चन्नम्मा, संगोळ्ळी रायण्णा, राजवाड्यातील दरबारी अधिकारी यांच्या वेशभूषेतील मुले, मुली, विविध कलापथके, चित्ररथ, लोकनृत्य, झांजपथकासह विविध मंगलवाद्यांनी निघालेल्या मिरवणुकीत मंत्री जारकीहोळी यांच्यासह नागरिक, महिला, डोक्यावर कुंभकलश घेतलेल्या सुवासिनी आदी सहभागी झाल्या होत्या. या मिरवणुकीत रस्त्याच्या दोन्ही बाजुने फुलांचा वर्षाव करून महिला स्वागत करीत होत्या. राणी चन्नम्मा पुतळ्याचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला. शिवानंद तल्लूर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.