जिंकता जिंकत राजस्थान हरला
रोमांचक सामन्यात लखनौचा 2 धावांनी विजय : सामनावीर आवेश खानचे 3 बळी
वृत्तसंस्था/ जयपूर
आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सची खराब कामगिरी सुरु असून शनिवारी झालेल्या सामन्यात त्यांना अवघ्या दोन धावांनी पराभव स्वीकारावा लागला. लखनौ सुपर जायंट्सने एका शानदार सामन्यात राजस्थानला शेवटच्या चेंडूवर 2 धावांनी हरवले. काही दिवसांपूर्वी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध शेवटच्या षटकात 9 धावा काढण्यात अपयशी ठरलेल्या राजस्थानला पुन्हा एकदा त्याच परिस्थितीला सामोरे जावे लागले, जेव्हा संघ पुन्हा शेवटच्या षटकात 9 धावा करू शकला नाही. यावेळी अवेश खानने त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे सामना त्यांच्याकडून हिसकावून घेतला.
प्रथम फलंदाजी करताना लखनौने 5 गडी गमावत 180 धावा केल्या. यानंतर विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानला 178 धावापर्यंत मजल मारता आली. राजस्थानला शेवटच्या षटकात जिंकण्यासाठी 9 धावांची गरज होती. एकीकडे आवेश खान गोलंदाजी करत होता तर दुसरीकडे राजस्थानचा शिमरोन हेटमायर होता. हे दोघेही चांगल्या फॉर्मात होते. त्यामुळे सामना कोण जिंकेल, हे कोणालाही माहिती नव्हते. हेटमायरने यापूर्वी झालेल्या 19 व्या षटकात दोन चौकार मारले होते, तर आवेश खान हा भेदक गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. आवेश खानने हेटमायरला बाद करत सामना आपल्या बाजूने फिरवला. लखनौसाठी ही सर्वात महत्वाची विकेट होती. जिथे हेटमायर बाद झाला तिथेच हा सामना लखनौच्या बाजूने फिरल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे ही विकेट राजस्थानला जिंकणारा सामना हरवणारी ठरली. राजस्थानकडून जैस्वालने सर्वाधिक 74 धावांचे योगदान दिले तर युवा खेळाडू वैभव सुर्यवंशीने 34 धावा फटकावल्या. लखनौकडून आवेश खानने 3 गडी बाद केले.
लखनौचा धमाकेदार विजय
लखनौने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि लखनौची सुरुवातच खराब झाली. जोफ्रा आर्चरने मिचेल मार्शची विकेट घेतली. त्याला फक्त चार धावा करता आल्या. यानंतर संदीप शर्माने निकोलस पूरनला एलबीडब्ल्यू बाद केले. त्याला फक्त 11 धावा करता आल्या. त्याच वेळी, कर्णधार ऋषभ पंत पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. त्याने फक्त तीन धावा केल्या.
पहिल्या तीन विकेट गमावल्यानंतर लखनौने बदोनीचा फलंदाजीत इम्पॅक्ट प्लेयर म्हणून वापर केला. बदोनी आणि मार्कराम यांच्यात चौथ्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी झाली. यादरम्यान, मार्करामने 45 चेंडूत 66 धावा आणि बदोनीने 34 चेंडूत 50 धावा केल्या. त्याच वेळी, डेथ ओव्हर्समध्ये अब्दुल समदचा तडाखा पाहिला मिळाला. त्याने फक्त 10 चेंडूत 300 च्या स्ट्राईक रेटने 30 धावा केल्या. डावाच्या शेवटच्या षटकात त्याने एकूण 27 धावा केल्या. यामुळे लखनौने 20 षटकांत 5 गडी गमावत 180 धावा केल्या. राजस्थानकडून वानिंदू हसरंगा दोन तर जोफ्रा आर्चर, संदीप शर्मा आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.