वळिवाचा दणका
जनजीवन विस्कळीत : टिळकवाडी, अनगोळ, शहापूर भागात रस्त्यावर पाणी
टिळकवाडी परिसरात अर्धवट कामांमुळे रस्त्यावर पाणी
टिळकवाडी परिसरात मनपाकडून विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. गटारींचे काम सुरू असून अनेक ठिकाणी काम अर्धवट आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास मार्ग नसल्याने पाणी साचून रस्त्यांना तलावाचे स्वरुप आले होते. शिवाजी कॉलनी, विवेकानंद कॉलनी, व्हॅक्सिन डेपो रोड, महर्षि रोड, आदी भागातील रस्त्यांवर पावसाचे पाणी साचले होते. यामधूनच नागरिकांना ये-जा करावी लागली. तर अर्धवट कामांमुळे पाण्याचा निचरा न झाल्याने सांडपाणी रस्त्यावर पसरले होते. खासबागमध्ये रविवारी बाजार भरतो. पावसाने भाजी विक्रेत्यांची अक्षरश: दैना केली. पावसापासून बचाव करून घेणे त्यांना अशक्य झाले. खडेबाजार शहापूरमध्येही हीच परिस्थिती होती. ताडपत्रीने भाजी झाकून ठेवण्याचा अवकाशही पावसाने दिला नाही. असंख्य भाजी विक्रेत्यांची भाजी वाहून गेली. विक्रीसाठी आणलेले टोमॅटो, बटाटे वाहून जात असताना त्यातही विक्रेत्यांनी शक्यतो जितके होईल तितका भाजीपाला वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. शहापूरच्या खडेबाजार मुख्य बाजारपेठेत अनेक ठिकाणी रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले होते. गटारी तुडुंब भरून पाणी रस्त्यावरून वाहात होते. त्यामुळे गटारीतील कचरा रस्त्यावर पसरला होता. दरम्यान, शहापूर कोरे गल्ली येथे वादळी पावसाने झाड कोसळून दुचाकीचे नुकसान झाले.
झाड कोसळून वाहनांचे नुकसान, अनगोळ परिसरात घरांमध्ये पाणी
दमदार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळून शनिवारी काही दुचाकींचे नुकसान झाले होते. त्याप्रमाणेच रविवारीही दमदार पाऊस झाल्याने संत मीरा स्कूल अनगोळ रोड येथील भलामोठा वृक्ष कोसळल्याची घटना घडली. यामध्ये झाडाखाली लावण्यात आलेल्या दुचाकींसह रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. तर वृक्ष रस्त्यावर पडल्याने रहदारीला अडथळा निर्माण झाला होता. रस्त्याच्या काँक्रिटीकरणामुळे झाडांची मुळे कमकुवत बनल्याने झाडे कोसळत असल्याचे सांगण्यात येत आहे. राजहंस गल्ली, अनगोळ येथील सखल भागात असणाऱ्या नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने तारांबळ उडाली. त्यामुळे अनगोळ भागातील अनेक गल्ल्यांमध्ये असा प्रकार घडला आहे. हिंदवाडीत रात्री उशिरा ट्रान्स्फॉर्मर कोसळला. मात्र सुदैवाने अनर्थ टळला.
आनंदनगर परिसरात पाणीच पाणी ,घरात पाणी शिरल्याने तारांबळ : नाला काम पूर्ण न केल्यास आंदोलन
रविवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे आनंदनगर परिसरात पाणीच पाणी झाले. पावसाच्या पाण्याने रस्ते भरून वाहत होते. अनेकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पाऊस इतका मोठा होता की, परिसरातील संपूर्ण रस्ते व गटारी पाण्याने भरून वाहात होते.
आनंद नगरातील नाल्याचे काम अर्धवट
आनंदनगर परिसरातील नाल्याचे काम आनंदनगरच्या दुसऱ्या क्रॉसपर्यंत करून अर्धवट स्थितीत सोडल्यामुळे नाल्यातून भरपूर प्रमाणात पाणी येऊन आनंदनगर दुसऱ्या क्रॉसनजीकच्या अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरून तारांबळ उडाली. अनेकांना पावसाचे पाणी काढण्यासाठी कसरत करावी लागत होती. घरात पाणी शिरल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची मोठी हानी झाली. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. तेव्हा प्रशासनाने आनंद नगरातील या नाल्याचे काम तात्काळ पूर्ण करावे अन्यथा आंदोलन करू असा या परिसरातील नागरिकांनी इशारा दिला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे लक्ष पुरवून तात्काळ ही समस्या सोडवावी अशी मागणीही होत आहे.