शहरातील रेल्वे उड्डाणपुलांची वाताहत
रस्त्यांची खडी उखडल्याने वाहने चालविणे अवघड : दुरुस्तीबाबत कोणत्याही उपाययोजना न केल्याने नाराजी
बेळगाव : शहरामध्ये चार ठिकाणी रेल्वे ओव्हर ब्रिज असून यापैकी दोन रेल्वे ओव्हर ब्रिजची अवस्था दयनीय झाली आहे. विशेषत: टिळकवाडी येथील तिसरे रेल्वेगेट उड्डाणपुलावर काही ठिकाणी भराव खचला असून यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. तर कपिलेश्वर उड्डाण पुलावर रस्त्याची धूळदान झाली असून दुचाकी चालकांना तारेवरची कसरत करत वाहने हाकावी लागत आहेत.
कपिलेश्वर रेल्वे उड्डाणपुलावरील रस्त्यावर दोन वर्षांपूर्वी दुरुस्ती करण्यात आली होती. परंतु अवघ्या काही दिवसातच उड्डाणपुलावरील रस्त्याची खडी निखळली. सध्या तर उड्डाण पुलाच्या मुख्य भागात पावसाचे पाणी साचले असून खडीचे ढिगारे साठले आहेत. रस्त्याची खडी वाहून गेल्याने उड्डाणपुलावर चर पडली आहे. त्यामुळे केव्हा अपघात होईल याची शाश्वती नाही. विशेषत: महिला वर्गाला वाहने चालविताना अनेक समस्या येत आहेत. एखाद्या निष्पापाचा जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त प्रश्न वाहनचालकांतून विचारला जात आहे.
गोगटे ओव्हर ब्रिज येथेही अनेक ठिकाणी खड्डे पडले असून रात्रीच्यावेळी खड्डे निदर्शनास न आल्याने अपघात होत आहेत. तर टिळकवाडी येथील तिसरे रेल्वेगेट उड्डाणपुलावर काही ठिकाणी रस्त्याची वाताहत झाली आहे. तर अनेक ठिकाणी रस्त्याची खडी वाहत जावून एका ठिकाणी साचली आहे. वाहनचालकांनी तक्रारी दाखल करूनदेखील उड्डाणपुलावर दुरुस्तीबाबत कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.