राहुल गांधींनी घेतली लोकसभाध्यक्षांची भेट
सभागृहात ‘आणीबाणी’वर केलेल्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुऊवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. आणीबाणीवर सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांनी संसदेत केलेल्या टिप्पणीवर राहुल यांनी नाराजी व्यक्त केली. सत्ताधाऱ्यांची ही चाल पूर्णपणे राजकीय हेतूने प्रेरित असून असे केले जाऊ नये, असे मतप्रदर्शन लोकसभा अध्यक्षांसमोर करण्यात आले. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल राव यांनी याबाबत माहिती दिली.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची घेतलेली भेट हा एक शिष्टाचाराचा भाग होता. राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर ‘इंडिया’मधील घटक पक्षांच्या नेत्यांनी प्रथमच लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. याचदरम्यान सभागृहाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच आणीबाणीचा मुद्याही राहुल गांधी यांनी उपस्थित केला असे वेणुगोपाल म्हणाले.
लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बिर्ला यांनी 1975 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केल्याचा निषेध केला होता. यानंतर सभागृहात विरोधकांनी गोंधळ घातला होता. तसेच काँग्रेस खासदार के. सी. वेणुगोपाल राव यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे. लोकसभेत ज्या पद्धतीने आणीबाणीवर भाषणबाजी करण्यात आली ती संसदीय परंपरांची थट्टा आहे, असे या पत्रात म्हटले आहे. वेणुगोपाल यांनी या मुद्यावर चिंता व्यक्त केली आहे.