राधानगरीचा 3 एप्रिल पासून खेळोत्सव, नवीपेठ, जुनीपेठ अंबाबाई व जोतिबाचा खेळ, शेकडो वर्षाची परंपरा
राधानगरी /महेश तिरवडे
कोल्हापूर जिल्हा म्हटलं की, पहिलं नाव ओठांवर येतं ते राजर्षी शाहू महाराज यांचं.कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुफलाम व्हावा या उद्देशाने राधानगरी धरणाची निर्मिती केली व शहराची निर्मिती केली, जिल्ह्याला वरदान ठरलेला राधानगरी तलाव हा छ, शाहू महाराजांनी उभारला होता. राधानगरीत दरवर्षी चैत्र महिन्यात खेळोत्सव साजरा केला जातो. या उत्सवातून देवांची उपासना करण्याबरोबरच राजर्षी शाहू महाराज यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली जाते.
शेकडो वर्षाची धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या सोहळ्यात सर्व समाजबांधव एकत्र यावा म्हणून राजर्षी शाहूंनी सुरू केलेला लोकोत्सव आजही राधानगरीकर तेवढाच पारंपरिक बाज ठेवून आत्मयितेने साजरा करतात. प्रत्येक पर्यंटकाने एकदा तरी अनुभवावा असा हा खेळोत्सव दरवर्षी भक्तिभावाने साजरा केला जातो.
कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेकडे असलेले एक निसर्गरम्य गाव म्हणजेच शाहू महाराजांचे आवडते राधानगरी. समृद्ध निसर्ग आणि वन्यजीवांची रेलचेल यामुळे या ठिकाणी अनेक पर्यटक वर्षभर भेट देत असतात. या गावाला जसा निसर्गाचा समृद्ध ठेवा लाभलेला आहे तसाच ऐतिहासिक आणि पारंपारिक उत्सवाची संस्कृती येथिल लोकांनी वर्षानुवर्षे जपली आहे. या ठिकाणी साजरा होणारा खेळ हा उत्सव पण आपला पारंपारिक बाज टिकवून आहे.
रंगपंचमी सुरू झाली की छ, राजाराम महाराज यांच्या पुण्यतिथी पासून या उत्सवाची लगबग सुरू होते. गावातील नवीपेठ अंबाबाई,बारावाडीची ग्रामदैवता जुनीपेठ अंबाबाई व गावठाण येथील जोतिबा या तीन मंदिरामध्ये वेगवेगळ्या दिवशी हा उत्सव तितक्याच उत्साहाने साजरा होतो. या उत्सवामध्ये गावातील सर्व जाती धर्मातील काही कुटुंबे मान मानकरी, खेळे मंडळी, बारा बलुतेदार म्हणून या उत्सवाची तयारी करतात. खेळे मंडळी रंगपंचमी पासून वर्गणी (तळी) मागायला सुरवात करतात .
या मध्ये प्रथम उत्सव हा छ,शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या भवानी म्हणजेच अंबाबाई मंदिरात साजरा करण्यात येतो यावेळी मंदिरावर आकर्षक रोषणाई केली जाते. खरा उत्सव हा रात्री 7 नंतर पालखी सोहळ्यासोबत सुरू होतो. प्रथम मान मानकरी खेळे मंडळी देवीची पालखी घेऊन हत्तीमहाल येथील गाव सीमेवरील मंदिरात जातात आणि तेथून गावात येतात.