वादग्रस्त गोलाच्या जोरावर कतारची भारतावर 2-1 ने मात
वृत्तसंस्था/ दोहा
फिफा विश्वचषक पात्रता फेरीच्या तिसऱ्या फेरीत ऐतिहासिक प्रवेश मिळवण्याची भारताची संधी खराब पंचगिरीने हिरावून घेतली आाणि कतारने मंगळवारी येथे झालेल्या सामन्यात वादग्रस्त गोलच्या जोरावर 2-1 असा विजय मिळविला. लल्लियांझुआला छांगटेने 37 व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे भारत पुढे होता. पण चेंडू मैदानाच्या बाहेर गेल्यावत दिसल्यानंतरही युसेफ आयमनच्या गोलाला पंचाने वैध ठरविल्याने भारत अडचणीत आला.
या अत्यंत वादग्रस्त निर्णयामुळे भारताची गती बिघडली. त्यानंतर आशियाई विजेत्या कतारने 85 व्या मिनिटाला अहमद अल-रावी याच्यामार्फत दुसरा गोल करून सामन्याचा निकाल निश्चित केला. दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या शेवटच्या सामन्यात कुवेतने अफगाणिस्तानवर 1-0 अशी मात केली. त्यामुळे कतार आणि कुवेत यांनी पुढील फेरीत प्रवेश केला आहे.
देशाचा महान फुटबॉलपटू सुनील छेत्री याच्या निवृत्तीनंतर जेमतेम पाच दिवसांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना 121 व्या क्रमांकावर असलेल्या भारताला संधी असल्याचे कुणालाही वाटले नव्हते. परंतु इगोर स्टिमॅचच्या खेळाडूंनी शैलीत चित्र फिरविले व छांगटेच्या गोलनंतर योग्य दिशेने मार्गक्रमण केले. ब्रँडन फर्नांडिसच्या पासवर मिझोरामचा 27 वर्षीय विंगर छांगटेने चेंडू जाळीत सारला. ब्रँडनने तयार केलेल्या दोन संधींचे ऊपांतर करण्यात त्यापूर्वी त्याला अपयश आले होते. या गोलमुळे छांगटे हा सध्या खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये भारतातर्फे सर्वाधिक 8 गोल करणारा फुटबॉलपटू बनला आहे.