पीकहानी झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित भरपाई द्या
विमा कंपन्यांच्या विलंब धोरणावर शेतकऱ्यांकडून तीव्र नाराजी
बेळगाव : दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अनेक शेतकऱ्यांकडून पीक विमा घेण्यात आला आहे. मात्र, विमा कंपन्यांकडून भरपाई देण्यास विलंब धोरण अवलंबिण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या संकटात भरच पडली आहे. शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन त्वरित भरपाई देण्यासाठी तरतूद करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन राज्य रयत कामगार आणि महिला संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. सौंदत्ती तालुक्यातील करिकट्टी गावामधील 30 हून अधिक शेतकऱ्यांनी 2016-17 मध्ये पीक विमा घेतला होता. सदर शेतकऱ्यांना पीक विमा नुकसानभरपाई मिळाली नसल्याने त्यांनी ग्राहक न्यायालयात धाव घेतली आहे. सदर शेतकऱ्यांना त्वरित भरपाई देण्यात यावी. 2022-23 या खरीप हंगामातील पिकांचे नुकसान प्रत्यक्ष पाहून नुकसानभरपाई देणे आवश्यक होते. मात्र, तसे झाले नाही. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. 2023-24 हंगामातील खरीप हंगामात दुष्काळामुळे पिकांची हानी झाली आहे. सदर पीक हानी देण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा. याबरोबरच जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक तीन महिन्यांतून एकदा शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात. खरीप आणि रब्बी हंगामात विमा कंपन्यांकडून पीकहानी विमा भरून घेतला जातो. मात्र, नुकसानभरपाई देताना विलंब धोरण अवलंबिले जात आहे. अनेकांना त्याची भरपाई देण्यात आलेली नाही. यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेऊन प्रयत्न करावेत. गेल्या तीन महिन्यांपासून रोजगार हमीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना वेतन देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट आले असून त्वरित वेतन देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.