मुंबई, पुणे शहरांना विमानसेवा उपलब्ध करून द्या
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावहून मुंबई व पुण्यासाठी दररोज विमानसेवा उपलब्ध नसल्याने उद्योजक व व्यापाऱ्यांची गैरसोय होत आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून पुणे हे आयटी हब आहे. त्यामुळबेळगावमधून दररोज विमानसेवा सुरू करावी अशी मागणी बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिजच्यावतीने खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी खासदार शेट्टर यांची भेट घेऊन बेळगावमधील रस्ते, रेल्वे सेवा व विमानसेवेबाबत मागण्या वाढल्या. बेळगाव-बेंगळूर मार्गावर वंदे भारत सुरू करण्यासोबतच बेळगाव रेल्वे स्थानकावर पीटलाईनची व्यवस्था मागणी करण्यात आली. बेळगावनजीकच्या सांबरा व देसूर या दोन्ही रेल्वे स्थानकांना हायटेक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात यामुळे बेळगावमधील अतिरिक्त सेवा तेथे वळविण्यात येतील. त्याचबरोबर बेळगाव परिसरात नवीन औद्योगिक वसाहत निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी खासदारांकडे करण्यात आली.
बेळगाव-गोवा रस्त्याची चाळण
उद्योजकांनी बेळगाव-गोवा रस्त्याबाबत नाराजी व्यक्त केली. चोर्ला व रामनगर या दोन्हीही रस्त्यांची चाळण झाली आहे. वाहने चालविणे कठीण झाल्यामुळे गोव्यातील ग्राहक बेळगावऐवजी खरेदीसाठी इतर शहरांना जात आहेत. त्यामुळे बेळगावच्या व्यापाराला फटका बसत असून, खासदारांनी या समस्येकडे प्रामुख्याने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजीव कट्टीशेट्टी, लघु उद्योग भारतीचे कर्नाटक अध्यक्ष सचिन सबनीस, राजेंद्र मुतगेकर, उदय जोशी, स्वप्नील शहा यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.