फशी पडलेल्या गुंतवणूकदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे
बेळगाव : विविध चिटफंड तसेच फायनान्स कंपन्यांमध्ये पैसे गुंतवून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संताप व्यक्त केला. मागील अकरा वर्षांपासून गुंतविलेली रक्कम दिली जात नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. आपल्या हक्काचा पैसा सरकारने पुन्हा मिळवून द्यावा, अशी मागणी गुंतवणूकदारांकडून करण्यात आली. अधिक व्याज मिळेल, या आशेने गुंतवणूकदारांनी चिटफंड, मायक्रो फायनान्स, नेटवर्क मार्केटिंग कंपन्यांमध्ये पैसा गुंतविला. परंतु, योग्य मुदतीत पैसे परत देण्यापूर्वीच कंपन्यांनी गाशा गुंडाळला. यामुळे बेळगाव जिल्ह्यातील नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक झाली. सर्वसामान्यांनी मिळविलेला घामाचा पैसा कंपन्यांमध्ये घातल्याने त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली. तसेच कमिशनच्या रकमेपायी अनेकांनी आपल्या परिचयातील नागरिकांकडून पैसे जमा करून कंपनीमध्ये घातले आहेत. मागील अकरा वर्षांपासून याविरोधात लढा सुरू आहे. परंतु, सेबीने कंपन्यांचे खाते गोठवल्याचे कारण देत नागरिकांचा पैसा तेथेच अडकून आहे. त्यामुळे सरकारने टप्प्याटप्प्याने का होईना, परंतु हा पैसा नागरिकांना पुन्हा मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे.