पाणीटंचाईमुळे बेंगळूरचे सामने पुण्यात घेण्याचा प्रस्ताव
एमसीए अध्यक्ष रोहित पवार यांची माहिती
सुकृत मोकाशी / पुणे
बेंगळूरमध्ये असलेल्या भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर येथील आयपीएलच्या मॅचेस पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर घेण्यात याव्यात, असा प्रस्ताव मी बीसीसीआयकडे दिला असल्याची माहिती एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार यांनी ‘तऊण भारत’शी बोलताना दिली. आयपीएलचा हंगाम सुरू झाला असून, आयपीएलच्या मॅचेस या विविध मैदानावर होत आहेत. बेंगळूरमध्येही या मॅचेस होणार आहेत. पहिल्या 21 सामन्यांमधील 3 सामने हे बेंगळूरमध्ये होणार आहेत. या 21 सामन्यांमधील एकही सामना पुण्याला मिळालेला नाही. उन्हाळी हंगाम सुरू होण्याआधीच कर्नाटकातील हायटेक शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजधानी बेंगळूरमध्ये पाण्याचे संकट ओढवले आहे. येथील लाखो लोक पाण्याच्या प्रत्येक थेंबावर अवलंबून आहेत, अशी परिस्थिती आहे. पाणी टंचाई मोठ्या प्रमाणावर भासत आहे. या समस्येतून जनतेला दिलासा देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात असले, तरी ते अपुरे पडत असल्याचे दिसून येत आहे. नैत्य मॉन्सून आणि इशान्य मॉन्सून पाऊस कमी झाल्याने शहरातील भूजल पातळी खूपच खाली गेली आहे. परिणामी तेथे पाणीबाणीची स्थिती निर्माण झाल्याने पाणीबचत करणे महत्त्वाचे बनले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना रोहित पवार म्हणाले, प्रत्येक टीमच्या फ्रँचाईला मैदान आहे. पुण्याचा संघ आयपीएलमध्ये नाही. बंगळूरमध्ये आत्ता मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवत आहे. वेगवेगळ्या फ्रँचाईच्या मॅचेस पुण्यात होत असतात. त्यामुळे बेंगळूरमध्ये असलेल्या भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर बेंगळूरमधील आयपीएलच्या मॅचेस पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर घेण्यात याव्यात, असा प्रस्ताव मी बीसीसीआयला दिलेला आहे. मैदान म्हटले, की पाणी हे खूप लागते. त्यात सध्या अतिशय कडक असा उन्हाळा आहे. त्यामुळे बेंगळूर शहरात भीषण पाणी टंचाई आहे. त्यामुळे तेथील मॅचेस या पुण्यात घेण्याच्या दृष्टीने आम्ही तयारी दाखविली असल्याकडे पवार यांनी लक्ष वेधले.