पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी मनपाची तयारी
शहरात विविध ठिकाणी निवारा केंद्रे, मदतीसाठी हेल्पलाईन सुरू
बेळगाव : गेल्या दोन दिवसांपासून शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नदी-नाले व सखल भागांमध्ये पाणी साचून राहत आहे. अधिक पाऊस झाला तर शहरातील काही भागामध्ये पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महानगरपालिकेने निवारा केंद्रे स्थापन करण्यासाठी नियोजन केले असून शहरामध्ये एकूण 10 निवारा केंद्रे निर्माण करण्याचे निश्चित केले आहे. निसर्गाचा कधी रुद्रावतार पहायला मिळेल याची शाश्वती नसते. त्यामुळे पूर निवारण करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रथमच नियोजन करत असते. महानगरपालिकाही दरवर्षी हे नियोजन करत असते. यावर्षीही अधिक पाऊस झाल्यास कुटुंबांना स्थलांतरित करण्यासाठी निवारा केंद्रांची नावे निश्चित केली आहेत. महानगरपालिकेच्या मुख्य अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी याची तयारी केल्याचे सांगितले.
शहरातील कोणत्याही भागामध्ये अधिक प्रमाणात पाणी साचल्यास त्या पाण्याचा निचरा करण्यासाठी जेसीबी, टिप्पर तयारीत ठेवण्यात आले आहेत. याचबरोबर ड्रेनेज ब्लॉक झाल्यास स्वच्छ करण्यासाठी सकिंग वाहनेही तयारीत ठेवण्यात आली आहेत. गटारी व नाल्यांमध्ये अधिक पाणी झाल्यास त्या पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य ते पाऊल उचलले जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पावसामुळे आपत्कालिन परिस्थितीमध्ये मदत हवी असल्यास संपर्क साधण्यासाठी दोन हेल्पलाईन सुरू करण्यात आल्या आहेत. जनतेसाठी 24 तास या हेल्पलाईन उपलब्ध राहणार आहेत. 0831-2405337 आणि 0831-2405316 यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.