गणेशगीतेची पूर्वपीठिका
अध्याय पहिला
विश्वाची निर्मिती होताना ब्रह्मा, विष्णू, महेशांची प्रथम निर्मिती झाली. त्यांना नेमून दिलेल्या उत्पत्ती, स्थिती आणि लय ही कार्ये ते करू लागले. सर्व सुरळीतपणे सुरु झाल्याची खात्री झाल्यावर ब्रह्मदेव श्रीविष्णूंच्या दर्शनासाठी वैकुंठात गेले. त्यावेळी श्रीविष्णू कोणाचे तरी ध्यान करत असल्याचे त्यांना दिसले. ते पाहून श्रीविष्णूंना नमस्कार केल्यावर त्यांनी विचारले, आपण सर्वेश्वर असून समर्थ आहात. सर्व लोक आपले ध्यान करत असतात पण आत्ता मी पाहिले की आपण कोणाचे तरी ध्यान करत आहात हे कसे? तेव्हा विष्णू म्हणाले, मी ब्रह्मणस्पती गणेशाचे ध्यान करत आहे. त्याच्या कृपाप्रसादानेच आपण समर्थ होऊन सर्व सुखे प्राप्त करू शकतो. त्या परमात्मस्वरूपाला जाणून घेऊन त्याची भक्ती करणाऱ्याला सर्व पुरुषार्थांची प्राप्ती होते. विष्णूंचे बोलणे ऐकून ते श्रीविष्णुंना म्हणाले, देवा मी आपल्याला शरण आलो आहे. तेव्हा, श्रीगणेशाचे ज्ञान कृपा करून मला सांगावे. ब्रह्मदेवाची प्रार्थना ऐकून श्रीविष्णूंना अतिशय आनंद झाला. त्यांनी ब्रह्मदेवांना गणेशज्ञान सांगायला सुरवात केली. प्रथम श्रीविष्णुंनी गणेशपुराण सांगितले नंतर त्यातील गणेशगीतेचा म्हणजेच योगामृतशास्त्राचा उपदेश केला. सध्याच्या कलियुगातील तमोगुणसंपन्न वातावरणामुळे ज्ञान करून घेण्याची पात्रता कोणातच नव्हती. म्हणून सर्व देवांनी श्रीविष्णूंना प्रार्थना केली की, कलियुगात सर्वच जनता अज्ञानी, पापबुद्धीची, कुटील आणि अश्रद्ध आहे तर मग या वेदविज्ञानाचा प्रसार कसा होणार? ह्यासाठी काहीतरी उपाय करावा. देवमंडळींनी केलेली प्रार्थना ऐकून त्यांनी देवांना आश्वासन दिले की, पराशर आणि सत्यवती ह्यांचे पोटी मी व्यास ह्या नावाने अवतार धारण करीन. व्यासावतारात देवांनी वेदांचा विस्तार करून त्याचे चार भाग केले. त्या कामाची सुरवात करताना श्रीव्यासाना असे वाटले की, कोणतेही कार्य करण्यापूर्वी प्रथम श्रीगणेशाची पाद्यपूजा करणे आवश्यक असते परंतु मी तर श्रीविष्णूचा अवतार असून सर्वज्ञ आहे मग मला श्रीगणेशाची पाद्यपूजा करायची काय आवश्यकता आहे? असे मनात आणून त्यांनी वेदाचे चार भाग करायच्या कामाची सुरवात तर केली पण अचानक बुद्धी व इतर अवयव बधीर झाले. त्यांना काही सुचेना. तेव्हा ते ब्रह्मदेवांना शरण गेले. ब्रह्मदेवांनी व्यासांच्या मनातले विचार आधीच जाणले होते. ते त्यांना म्हणाले, तुला आपण सर्वज्ञ आहोत ह्याचा गर्व झाला आहे. त्यामुळे तू बुद्धीपती श्रीगणेशाचा अनादर केलेला आहेस. त्यातूनच तुझी अशी अवस्था झाली आहे. त्यावर श्रीव्यासांनी ब्रह्मदेवांना गणेशपुराण सांगण्याची विनंती केली. त्यानुसार ब्रह्मदेवांनी व्यासांना गणेशपुराण सांगितले, ते ऐकल्यावर श्रीगणेशाच्या श्रेष्ठत्वाची व्यासांना कल्पना आली. मग व्यासांनी गणेशगीतेच्या श्रवणाची उत्सुकता ब्रह्मदेवाकडे प्रकट केली. ती ऐकून ब्रह्मदेवांनी व्यासांना गणेशगीता ऐकवली. नंतर श्रीव्यासांनी त्यांचे परमशिष्य सूतमुनी ह्यांना ती सांगितली. पुढे ही गणेशगीता गजानन-वरेण्यसंवादाच्या माध्यमातून सर्वांना समजली. वरेण्यराजा श्रीगणेशाला म्हणाला, हे गजानना ह्या संसारात मला अनेक दु:खे भोगावी लागली. ती दु:खे दूर होण्यासाठी मला मोक्षमार्ग दाखव. असा योगही सांग की ज्यामुळे माझ्यातील काम, क्रोध नष्ट होतील. वरेण्याची विनंती ऐकून श्रीगजाननांनी त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला. गणेशगीता ऐकून राजाला पूर्ण वैराग्य प्राप्त झाले. सर्वसंग परित्याग करून तो वनात गेला आणि श्रीगणेशाच्या उपदेशानुसार योगमार्गाचे आचरण करून मुक्त झाला. प्रत्येकाने काय केलं म्हणजे जीवनात शाश्वत समाधान मिळेल हे गणेशगीता समजाऊन सांगते.
क्रमश: