खानापूर तालुक्यात विजेचा लपंडाव
नागरिकांना करावा लागतोय अनेक समस्यांचा सामना
खानापूर : खानापूर शहर तसेच ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. हेस्कॉमने सुरळीत वीजपुरवठा करण्याकडे साफ दुर्लक्ष केले असून दिवसातून सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने विजेचा लंपडाव सुरू झाला आहे. पाऊस पडला की विद्युतपुरवठा खंडित होणे हे समीकरणच बनले आहे. त्यामुळे नागरिक खंडित वीजपुरवठ्यामुळे त्रस्त झाले आहेत. शहरासह तालुक्याचा वीजपुरवठा सुरळीत व्हावा, अशी मागणी जनतेतून होत आहे. गेल्या महिन्याभरापासून शहरासह संपूर्ण तालुक्याच्या ग्रामीण भागात खंडित वीजपुरवठ्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. हेस्कॉमच्या या कारभाराबाबत अनेकवेळा नागरिकांतून मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात आल्या आहेत. मोर्चे, निवेदनेही देण्यात आली आहेत. हेस्कॉमने आपला कारभार सुधारलेला नाही. दिवसातून अनेकवेळा वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. यामुळे अनेकवेळा विजेवर आधारित उपकरणे नादुरुस्त होण्याचे प्रकार घडत आहेत. तसेच खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरासह तालुक्यात पाऊस होत आहे. थोड्या प्रमाणात पाऊस झाला की, विद्युतपुरवठा खंडित करण्यात येत आहे. पाऊस पडला की विद्युतपुरवठा खंडित होणे हे समिकरणच बनले आहे. पाऊस पडल्यानंतर काही वेळेत वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे पाऊस आणि विद्युतपुरवठा खंडित होणे हे हेस्कॉमसाठी निमित्त बनले असल्याची चर्चा शहरात होत आहे.
कूपनलिकांच्या अनेक मोटारी जळण्याच्या घटना
सध्या तीव्र उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. तसेच शहरातील पाणीपुरवठा हा कूपनलिकेवर आधारित असल्याने खंडित वीजपुरवठ्यामुळे पाणीपुरवठ्याच्या कामावरही परिणाम झाला आहे. तसेच शहरातील अनेक कूपनलिकांच्या अनेक मोटारीही जळालेल्या आहेत. वारंवार खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत अनेकवेळा विद्युतपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी करूनदेखील हेस्कॉमने आपल्या कारभारात सुधारणा केली नसल्याचे दिसून येत आहे.