For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पोर्ट ब्लेअर आता ‘श्री विजयपुरम’

06:21 AM Sep 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
पोर्ट ब्लेअर आता ‘श्री विजयपुरम’
Advertisement

केंद्र सरकारकडून नावात बदल : अमित शहा यांची माहिती

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केंद्र सरकारने अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरचे नाव बदलले आहे. सरकारने पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून ‘श्री विजयपुरम’ केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी ट्विट करून याबाबत माहिती दिली.

Advertisement

‘देशाला गुलामगिरीच्या सर्व प्रतीकांपासून मुक्त करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पाने प्रेरित होऊन आज गृह मंत्रालयाने पोर्ट ब्लेअरचे नाव ‘श्री विजयपुरम’ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.’ असे ट्विट गृहमंत्र्यांनी केले आहे. ‘श्री विजयपुरम’ हे नाव आपला स्वातंत्र्यलढा आणि त्यात अंदमान निकोबारचे योगदान दर्शवते. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यात आणि इतिहासात या बेटाला अनन्यसाधारण स्थान आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

इतिहासात अनन्यसाधारण स्थान

चोल साम्राज्यात नौदल तळाची भूमिका बजावणारे हे बेट आज देशाच्या सुरक्षा आणि विकासाला गती देण्यासाठी सज्ज आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तिरंगा फडकावल्यापासून ते वीर सावरकर आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांनी सेल्युलर जेलमध्ये केलेल्या भारत मातेच्या स्वातंत्र्याच्या लढ्यापर्यंतच्या घटनांचे हे बेट साक्षीदार आहे, असेही ‘एक्स’मध्ये एका पोस्टद्वारे माहिती देताना अमित शहा यांनी लिहिले आहे.

यापूर्वी, 23 जानेवारी 2023 रोजी नेताजींच्या 126 व्या जयंतीदिनी पंतप्रधान मोदींनी अंदमान आणि निकोबार बेटांच्या 21 बेटांना परमवीर चक्र विजेत्यांच्या नावावरून संबोधण्याचा निर्णय घेतला होता. तर, 28 डिसेंबर 2018 रोजी अंदमान आणि निकोबारच्या हॅवलॉक बेट, नील बेट आणि रॉस बेटाची नावे बदलण्यात आली. हॅवलॉक बेटाचे नाव स्वराज द्विप, नील बेटाचे नाव शहीद द्वीप आणि रॉस बेटाचे नाव नेताजी सुभाषचंद्र द्वीप ठेवण्यात आले होते.

Advertisement
Tags :

.