जांबोटी-खानापूर राज्यमार्गाची कान्सुली फाट्यानजीक दुर्दशा
वाढत्या वाहतुकीमुळे रस्त्याच्या दुर्दशेत भर
वार्ताहर /जांबोटी
जांबोटी-खानापूर राज्य महामार्गाची कान्सुली फाट्यानजीक पार दुर्दशा झाली असून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे खराब रस्त्यामुळे वाहनधारकांचे हाल होत आहेत. रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे. जांबोटी-खानापूर या 18 किलोमीटर रस्त्याचा समावेश जत्त-जांबोटी राज्य महामार्ग क्रमांक 31 अंतर्गत होतो. आंतरराज्य वाहतुकीच्या दृष्टीने हा खानापूर तालुक्यातील महत्त्वाचा रस्ता म्हणून गणला जातो. सुमारे दहा वर्षांपूर्वी या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र या रस्त्यांपैकी कान्सुली फाटा ते मोदेकोप फाट्यादरम्यानच्या रस्त्याची दुर्दशा झाल्यामुळे चार-पाच वर्षांपूर्वी रस्त्याचे रुंदीकरण करून रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामकाजामुळे या ठिकाणच्या रस्त्याची दरवर्षी पावसाळ्dयात दुर्दशा होते. 1 वर्षांपूर्वी कान्सुली फाटा ते मोदेकोप गावापर्यंतच्या रस्त्याचे पुनर्डांबरीकरण करण्यात आले होते. शिवाय उन्हाळ्dयात रस्त्याचे पॅचवर्क्स देखील करण्यात आले होते. मात्र सद्यस्थितीमध्ये या ठिकाणच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, सध्या सुरू असलेल्या पावसामुळे या ठिकाणी रस्त्याला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाल्यामुळे या ठिकाणाहून वाहने चालविताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. दुचाकीधारकांना तर जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत असल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. तसेच या रस्त्यापैकी उचवडे फाटा व विजयनगर-गवळीवाडा नजिकच्या रस्त्याची देखील दुर्दशा झाल्यामुळे वाहनधारकांचे हाल होत आहेत.
रस्त्यावरील वाहतुकीत वाढ
वास्तविक पाहता बेळगाव-चोर्ला व्हाया पणजी हा रस्ता गेल्या दहा-बारा दिवसापासून कुसमळी नजीकच्या ब्रिटिशकालीन पूल वाहतुकीला धोकादायक बनल्यामुळे बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी या पुलावरून परिवहन मंडळाच्या बसेस तसेच अवजड वाहतुकीला बंदी आदेश दिला आहे. त्यामुळे गोव्याला जाण्यासाठी वाहतूकदार तसेच कर्नाटक परिवहन व कदंबा महामंडळाच्या बसेस जांबोटी-खानापूर या पर्यायी मार्गाचा वापर करीत असल्यामुळे या रस्त्यावरील वाहतुकीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र खराब रस्त्यामुळे वाहनधारकांना गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. तरी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या खानापूर विभागाच्या वरिष्ठ अभियंत्यांनी लक्ष घालून जांबोटी-खानापूर रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.