विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी चालविलेला खेळ महागात पडणार
’नीट’ मधील गोंधळावरून काँग्रेसचा इशारा, पणजी येथील आझाद मैदानावर आंदोलन,एनडीए सरकार विरोधात घोषणाबाजी
पणजी : देशात प्रत्येक क्षेत्रात बोकाळलेला भ्रष्टाचार आता शिक्षण क्षेत्रातही पोहोचला असून सरकारने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी चालविलेला हा खेळ त्यांना महागात पडणार आहे.हा खेळ केवळ विद्यार्थ्यांच्या भवितव्याशीच नव्हे तर त्यांच्यामधून निर्माण होणाऱ्या डॉक्टरच्या आणि पर्यायाने देशातील जनतेच्या आरोग्याशीही चालविलेला आहे, असा जोरदार आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला आहे.नीट परीक्षा आणि त्यातील गुणांच्या गोंधळामुळे हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य रखडले असल्याने त्याचा निषेध करण्यासाठी प्रदेश काँग्रेसचे नेते,पदाधिकारी आणि एनएसयूआय विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी यांनी संयुक्तपणे आझाद मैदानावर आयोजित केलेल्या धरणे आंदोलनात आलेमाव बोलत होते.
त्यावेळी कांग्रेस अध्यक्ष अमित पाटकर, खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस, एनएसयूआयचे अहराज मुल्ला, नौशाद चौधरी, एम. के. शेख, महिला काँग्रेस अध्यक्ष बिना नाईक, शंभू भाऊ बांदेकर, अमरनाथ पणजीकर आणि अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पुढे बोलताना आलेमाव यांनी, रावणाने सीतेचे अपहरण केले तेव्हा प्रभू रामाने हनुमंताला लंकेत पाठवले. तेथे रावणाच्या राक्षसांनी पकडून त्याच्या शेपटीला आग लावली. मात्र या दु:साहसाचे जबरदस्त परिणाम रावणाला भोगावे लागले. हनुमंताने संपूर्ण लंकाच जाळून टाकली आणि सीतेची सुटका केली.आता याच प्रकाराची पुनरावृत्ती होणार असून देशातील हजारो विद्यार्थी हनुमंताच्या शेपटीप्रमाणे एकत्र येऊन एनडीए सरकारच्या रावणराज्याचा पराभव करणार आहेत, असा इशारा दिला.
पाटकर यांनी बोलताना, नीट परीक्षा घोटाळ्यावर भाजप सरकारच्या निक्रियतेचा निषेध केला. नीट परीक्षा सर्व विद्यार्थ्यांसाठी पुन्हा घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. खासदार फर्नांडिस यांनी, काँग्रेस पक्षाकडून हा मुद्दा संसदेत उपस्थित करण्यात येईल, असे आश्वासन दिले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यापूर्वीच विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींची भेट घेऊन पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. नौशाद चौधरी यांनी बोलताना, नीट परीक्षा रद्द करण्याबाबत सरकारने कारवाई न केल्यास येत्या दि. 24 रोजी एनएसयूआय कडून संसदेचा ‘घेराव’ घालण्यात येईल, असा इशारा दिला. या आंदोलनात सहभागी अन्य मान्यवरांमध्ये तुलिओ डिसोजा, गुऊदास नाटेकर, एव्हरसन वालिस, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर तसेच एनएसयूआयचे अन्य सदस्य यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या एनडीए सरकारच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.