अंधश्रद्धा, जादूटोणा विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
अंधश्र्रद्धा, जादूटोणा आणि इतर तत्सम वाईट प्रथा दूर करण्यासाठी केंद्र आणि राज्यांना योग्य ती पावले उचलण्याचे निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. समाजात प्रचलित असलेल्या अवैज्ञानिक प्रथा बंद करण्यासाठी अंधश्र्रद्धा आणि जादूटोणाविरोधी कायद्याची गरज असल्याचे याचिकेत म्हटले आहे. तसेच निरपराध लोकांची पिळवणूक रोखण्यासाठी पावले उचलण्याची विनंतीही करण्यात आली आहे.
अधिवक्ता अश्विनी कुमार उपाध्याय यांनी दाखल केलेल्या याचिकेत संविधानाच्या कलम 51 अ चा संदर्भ देण्यात आला आहे. त्यानुसार नागरिकांमध्ये वैज्ञानिक समज, मानवता आणि तपासाची भावना विकसित करण्याच्या दिशेने पावले उचलण्याचे निर्देश केंद्र आणि राज्यांना द्यावेत, अशी विनंतीही करण्यात आली आहे. राज्यघटनेच्या या कलमात मूलभूत कर्तव्ये आहेत. त्यानुसार अंधश्र्रद्धा आणि क्रूर, अमानवी व शोषण करणाऱ्या प्रथांना आळा घालण्यासाठी कायदे करण्याची गरज आहे. अनेक लोक आणि संस्था अंधश्र्रद्धा आणि जादूटोणा करून धर्मांतर करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.