For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जनतेचा विश्वास हेच माझे मोठे भांडवल- नरेंद्र मोदी

06:50 AM Jan 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
जनतेचा विश्वास हेच माझे मोठे भांडवल  नरेंद्र मोदी
Advertisement

आम्ही गरिबांसाठी घेतलेला संकल्प पूर्ण करतोय याचा आनंद : सोलापुरात  विविध विकासकामांचे उद्घाटन

Advertisement

प्रतिनिधी/ सोलापूर

संपूर्ण जगात व देशात महाराष्ट्राचा गौरव वाढला आहे. देशातील व महाराष्ट्रातील जनतेच्या आशीर्वादामुळे व सरकारमुळे हे शक्य झाले आहे. केंद्रातील सरकारने गरिबांसाठी घेतलेला संकल्प पूर्ण करतोय याचा मनस्वी आनंद होत आहे. जनतेचा विश्वास हेच माझे सर्वात मोठे भांडवल असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

Advertisement

रे नगरच्या पहिल्या टप्प्यातील 15 हजार 24 घरांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या सोहळ्यात अमृत 2.0 योजना व प्रधानमंत्री स्वनिधी लाभार्थी योजना यासह विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. देशातील करोडो लोकांचा माझ्या पाठीमागे असलेला आशीर्वाद हीच माझी सर्वात मोठी ठेव असल्याचे यावेळी पंतप्रधान म्हणाले.

रे नगरातील 15 हजार घरांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी आमदार नरसय्या आडम यांच्या हस्ते प्रभू श्रीराम, लक्ष्मण, जानकीमाता यांची एकत्र असलेली मूर्ती भेट देत त्यांना जरीचा फेटा घालून सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैंस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख, माजी आ. नरसय्या आडम आदी मान्यवर उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले, 2014 ला प्रथम सत्तेत आल्यानंतर मी त्यावेळी म्हणालो होतो की, माझे सरकार गरिबांना समर्पित सरकार असेल. त्याचाच परिपाक म्हणून केंद्र सरकारच्या सर्व योजनांच्या केंद्रस्थानी गरिबांना ठेवूनच सर्व योजना लागू करण्यात येत आहेत. देशातील जनतेचे जीवन सुखाचे व्हावे यासाठी सत्तेच्या पहिल्या दिवसापासूनच माझा रामराज्य आणण्याचा प्रयत्न असल्याचे देखील पंतप्रधानांनी सांगितले. यावेळी भारत माता की जय, जय श्रीराम, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी सभास्थळ दणाणून गेले होते.

आधीच्या सरकारने ज्या काही योजना गरिबांसाठी आणल्या त्याचा लाभ मधल्या दलालांमार्फत लुटला जात होता. आधीच्या सरकारच्या नियतीत व निष्ठेत खोट होती, त्याबद्दल संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र आमची निष्ठा देशाप्रति असून देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचेच आमचे ध्येय आहे. म्हणूनच आम्ही गरिबांसाठी आणलेल्या योजनेतील दलालांना हटवले आहे. त्यामुळे काही लोक आरडाओरड करत आहेत, असाही आरोप पंतप्रधानांनी केला. आमच्या सरकारने गरिबांना सर्वोच्च प्राधान्य देताना 25 करोड लोकांना गरिबीतून वर काढले. हे दहा वर्षांच्या तपस्येचे फळ असून सरकारच्या प्रामाणिकपणाचा परिणाम असल्याचे मत यावेळी पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले.

Advertisement
Tags :

.