जनतेने एकजूट होऊन भाजपला धडा शिकवावा
काँग्रेसच्या संविधान बचाव अभियानात आवाहन : भाजपकडून संविधानात फूट पाडण्याची तयारी
पणजी : ‘’भाजप हटाव-संविधान बचाब-गोवा देश बचाव’ असे विविध नारे आणि घोषणा देऊन काँग्रेसच्या नेत्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला घरी पाठवा, असे आवाहन केले. पणजीतील आझाद मैदानावर गोवा प्रदेश काँग्रेस समितीतर्फे संविधान बचाव अभियान आयोजित करण्यात आले होते. गोव्यातील जनतेने एकजूट होऊन भाजप सरकारला धडा शिकवा, असे आवाहन सभेतून करण्यात आले. ‘वंदे मातरम्’ ने सभेची सुऊवात झाली. त्यावेळी मार्गदर्शन करताना काँग्रेसचे निरीक्षक माणिकराव ठाकरे यांनी सांगितले की डॉ. आंबेडकरांनी देशासाठी दिलेले संविधान देश जोडण्यासाठी महत्वाचे आहे. परंतू भाजपचे सरकार देश धर्म-जातीच्या आधारावर तोडण्याचे काम करीत आहे. आंबेडकरांचे विचार पुढे नेण्याचे आणि देश जोडण्याचे काम कॉग्रेस पक्ष करतोच त्यासाठीच ‘भारत जोडो’ यात्रा काढण्यात आली. भाजप मात्र संविधान बदलण्याची आणि धर्म-जातीच्या नावाने फुट पाडण्याची भाषा करतो. त्याला विरोध करण्यासाठी जनतेने पुढे यावे असे आवाहन ठाकरे यांनी केले.
दहशतवाद्यांना जात-धर्म नाही
काँग्रेसच्या गोवा प्रदेश प्रभारी अंजली निंबाळकर म्हणाल्या की अतिरेकी दहशतवादी हे देशद्रोहीच आहेत. यांना जात-धर्म लागत नाही. पण भाजपने पहलगाम हल्ला घटनेला जाती-धर्माचा रंग दिला. आता भाजप सरकार संविधानाला हात घालू पहात आहे. ते बचावणे ही काळाची गरज बनली असून त्यासाठी जनतेने आता आवाज उठवावा, असे आवाहन त्यांनी केले.
परप्रांतियांची कामे तातडीने
विरोधी पक्षनेते युरी आलेमावं म्हणाले की भाजप म्हणजे भ्रष्टाचार जुमला पार्टी असून गोव्यात शर्मा-वर्मा येऊन गोव्यातील जमिनी लुटत आहेत. गोमंतकीय जनतेच्या विविध कामांना उशीर होतो तर परप्रातीयांची कामे तातडीने होतात. आता तर जाती धर्माच्या फूट पाडणाऱ्या भाजप सरकारने संविधानातच फुट पाडण्याची तयारी केल्याचे त्यांनी साग़ितले.
राहुल, सोनियाविरोधात षडयंत्र
काँग्रेस नेत्यांवर चुकीचे आरोप लावून पक्षाला-नेत्यांना बदनाम व नेस्तनाबूत करण्याचे प्रयत्न भाजप करीत आहे अशी टीका आमदार कार्लूस फरेरा यांनी केली. त्यासाठी त्यांनी ‘नॅशनल हेराल्ड’ या वृत्तपत्राचे उदाहरण दिले. राहुल गांधी-सोनिया गांधी विरोधात हे षडयंत्र असल्याचा आरोप फरेरा यांनी केला. कॉग्रेस पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या सभेत दक्षिण गोवा खासदार विरीयातो फर्नांडिस गोवा प्रदेश महिला कॉग्रेस अध्यक्ष प्रतिक्षा खलप, गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर, कॉग्रेस नेते गिरीश चोडणकर, आमदार अल्टॉन डिकॉस्ता युवा काँग्रेस अध्यक्ष महेश नाडर याची भाषणे झाली. ‘वंदे मातरम्’ ने कार्यक्रमाची सुऊवात करण्यात आली तर शेवट राष्ट्रगीताने झाला. दिवजा सर्कल ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्याचा काँग्रेस पक्षाचा बेत होता. परंतु सरकारने परवानगी नाकारल्याने तो मोर्चा आयत्यावेळी रद्द करण्यात आला. पोप फ्रांसिस आणि पहलगाम हल्ल्यातील पर्यटकांच्या दु:ख निधनाबद्दल शोक व्यक्त कऊन सभेपुर्वी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अमरनाथ पणजीकर यांनी सभेचे सूत्रसंचालन केले.