Sangli : सांगलीत काँग्रेसमध्ये शांतता, भाजपाच्या गोटात हालचालींना वेग
भाजपा राष्ट्रवादी युतीची शक्यता : दोन्ही शिवसेनेचा स्वबळाचा नारा
by वैभव माळी
सांगली : पलूस पलूस नगर परिषद निवडणूकीचे वारे जोमाने वाहू लागले आहे. सत्ताधारी काँग्रेस पक्षाला शह देण्यासाठी विरोधी गटाची एकत्र मोट बांधणी अंतिम टप्यात आली आहे. काँग्रेसच्या गोटात मात्र वादळापूर्वीची शांतता पसरली आहे. भाजपा व राष्ट्रवादी एकत्रित आले तर काँग्रेससमोर तगडे आवाहन उभे राहू शकते. हे गृहीत धरून संयमी काँग्रेसकडून आपले पते ओपन न करता तोडीसतोड उमेदवार देण्याची रणनिती आखली जात आहे. दरम्यान शिंदे शिवसेना व उध्दव ठाकरेंची शिवसेनेने स्वबळचा नारा दिल्याने नगरपरिषद निवडणूक चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
पलूस नगरपरिषदेची आगामी निवडणूकीची दुसरी टर्म होत असून जेष्ठ नेत्यांच्या पश्चात युवकांच्या नेतृत्वाखाली पहिलीच निवडणूक होत असल्याने कोण किती पाण्यात आहे याचा अंदाज दर्शवणारी ही निवडणूक ठरणार आहे. पलूस कडेगावचे आमदार स्व. डॉ. पतंगराव कदम, स्व. नेते वसंतराव पुदाले, स्व. खाशाबा दळवी, स्व. बापूसाहेब येसुगडे, स्व. अमरसिंह इनामदार यांच्यासारख्या जेष्ट नेत्यांचे अकाली निधन झाले. त्यांच्या पश्चात पहिल्याच निवडणूकीला सामोरे जाताना तरूण नेत्यांना त्यांची पोकळी जाणवत आहे.
गतवेळी काँग्रेस विरुद्ध स्वाभिमानी, भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना यांनी स्वतंत्र लढत दिली. स्वाभिमानीला चार तर 1 जागा मिळाली होती. इतरांना एकही जागा आणता आली नाही. स्वतंत्र लढतीचा फायदा काँग्रेसला झाल्याने यावेळी 'एक है तो सेफ है' म्हणत भाजपा व राष्ट्रवादीने सर्व पातळीवर एकत्र येण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
सत्ताधारी काँग्रेसकडून आतापर्यत नगराध्यक्षपदाचा चेहरा समोर आलेला नाही परंतु वरिष्ट नेत्यांकडून बैठका घेतल्या जात असल्याचे सजमते. काँग्रेसविरूध्द प्रतिस्पर्धी गटाकडून नगराध्यक्षपदाचा संभाव्य चेहरा म्हणून निलेश येसुगडे यांच्या मातोश्री ज्योत्सनाताई येसुगडे यांचे नाव चर्चेतून पुढे येत आहे. तर काँग्रेस कडून जेष्ठ नेते वसंतराव पुदाले यांच्या कुटुंबात नगराध्यक्षपदाची संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जा पर्यत नगराध्यक्षपदाचा चेहरा समोर येत नाही तोपर्यत निवडणूकीचे चित्र स्पष्ट होणार नाही.
अलिकडे राजकीय उलथापालथ झाल्याने राजकीय समिकरणे बदलत आहेत. स्वाभिमानी विकास आघाडीचे नेते निलेश येसुगडे यांनी नुकताच राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करुन पलूस-कडेगाव विधानसभा क्षेत्राची सुत्रे हाती घेतली. या निवडणुकीत त्यांना मिळालेल्या संधीचा फायदा होईल असे मानले जाते. पलूस शहरात आठ दहा वर्षांत भाजपाला गट वाढवण्यात यश आले आहे.
निवडणूकीच्या पूर्वीच क्रांती साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने पलूस तालुक्यात भाजपाची ताकद वाढणार आहे. याचेही पडसाद निवडणूकीत उमटणार आहेत. काँग्रेस पक्षाकडे सहकाराच जाळ आहे. आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना पलूससाठी कार्यान्वीत केली. यापूर्वी कोट्यवधी रूपयांचा निधी पलूसच्या विकासासाठी दिला आहे. पलूस नगरपरिषदेची भव्य इमारत उभी करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.