बिथरलेल्या पाकिस्तानने रात्रीनंतर पुन्हा सकाळी भारतावर चढवला हल्ला
India Pakistan War: ऑपरेशन सिंदूरनंतर चवताळलेल्या पाकिस्तानने सूडापोटी गुरुवारी रात्री भारतावर हवाई केला होता. मात्र, भारतीय सैन्याने पाकिस्तानचा हवाई हल्ला परतवलाच पण पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून प्रमुख शहारांना लक्ष्य केले. भारतीय हवाई दल आणि नौदलाने केलेल्या प्रतिहल्ल्यामुळे पाकिस्तानची पळता भुई थोडी झाली. भारतीय वायदूलाने क्षेपणास्त्र आणि ड्रोन्सच्या साहाय्याने हल्ला करुन रात्रभर पाकिस्तानला अक्षरश: भाजून काढले होते. पाकिस्तानच्या इस्लामाबाद, लाहोर, क्वेटा या प्रमुख शहरांमध्ये अनेक ठिकाणी स्फोट झाले. त्यामुळे याठिकाणी प्रचंड घबराट पसरली आहे. इतकी अब्रू निघाल्यावर पाकिस्तान शांत बसेल, असे वाटत होते. मात्र, यानंतरही पाकिस्तानी सैन्याकडून जैसलमेर येथील सीमा सुरक्षा दल अर्थात बीएसएफच्या छावणीवर हल्ला करण्यात आला.
पाकिस्तानी सैन्याने पहाटे साडेचार ते साडेपाच या वेळेत ड्रोनने बीएसएफाच्या छावणीवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, याठिकाणीही भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानचे ड्रोन हाणून पाडले. काल रात्रीपासून भारताच्या एअर डिफेन्सने पाकिस्तानचे जवळपास 50 स्वार्म ड्रोन्स आणि अनेक क्षेपणास्त्रे पाडली आहेत. पाकिस्तानचा एकही हल्ला यशस्वी होऊ शकलेला नाही, हे भारतीय लष्कराच्यादृष्टीने खूप मोठे यश मानले जात आहे.
दरम्यान, भारतीय सैन्याने आज सकाळी पाकिस्तानी ड्रोन उद्ध्वस्त करतानाच एक व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये पाकिस्तनचा स्वार्म ड्रोन भारतीय हद्दीत फिरताना दिसत आहे. हा ड्रोन भारतीय सैन्यदलाने बरोबर टिपल्याचे दिसत आहे. भारतीय सैन्याने केलेल्या प्रतिहल्ल्यात लाहोर आणि इस्लामाबादमध्ये मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय, पाकिस्तानचे प्रमुख बंदर असलेल्या कराची येथे जवळपास 14 स्फोट झाले आहेत. याठिकाणी भारताच्या आयएनएस विक्रांत आणि कोलकाता क्लास डिस्ट्रॉयर या युद्धनौकांनी कराची बंदर बेचिराख केल्याची माहिती आहे.