गोव्याचे ‘आधुनिक भगीरथ’ संजय पाटील यांना पद्मश्री
गोव्याच्या शेतकऱ्याची केंद्र सरकारने प्रथमच घेतली दखल
पणजी : गोव्याचे कुळागार तथा बागायती सांभाळून स्वत:च्या हाताने डोंगर पोखरून स्वत:च्या कुळागारासाठी पाणी उपलब्ध करून घेणारे आणि अनेक बागायतदारांना देखील व घरांसाठी पाणी उपलब्ध करून देणारे गोव्याचे प्रगतीशील शेतकरी संजय अनंत पाटील यांना केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने रात्री उशिरा 110 पद्मश्री पुरस्कार जाहीर केले त्यात गोव्याच्या संजय अनंत पाटील, सीलवाडा- सावईवेरे फोंडा गोवा यांचा समावेश करण्यात आला आहे. संजय पाटील हे गेली 35 वर्षे कृषी क्षेत्रात ईमानेइतबारे व अत्यंत काबाडकष्ट करून शेती व्यवसाय तथा बागायती उत्पादन घेत आहेत.
शेतकऱ्यांना, बागायतदारांना होईल ऊर्जा प्राप्त
रात्री उशिरा त्यांना या पुरस्काराची घोषणा करण्यात आल्यानंतर त्याबाबत त्यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, गोव्याच्या शेतकऱ्याची केंद्र सरकारने प्रथमच दखल घेतली व हा पुरस्कार गोव्यातील शेतकऱ्यांचे एक प्रतीक ठरणार आणि त्यातून अनेक शेतकऱ्यांना तथा बागायतदारांना ऊर्जा प्राप्त होईल. आपण अत्यंत समाधानी एवढ्यासाठीच आहे की कुळागारात काम करणाऱ्याची केंद्र सरकारने कुठेतरी दखल घेतली. म्हणजेच शेती हा व्यवसाय खरोखरच चांगला आहे. हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. आपल्याला हा पुरस्कार देऊन केंद्राने आपल्यावर फार मोठे उपकार केले असेच आपण मानतो. कारण शेतकऱ्याची कोणी दखल विशेषत: घेत नसतो. गोव्यात पहिल्यांदाच एका कुळागार पाहणाऱ्याला हा पुरस्कार प्राप्त झाला व त्याचा आपण मानकरी ठरलो याबद्दल शतश: आपण सर्वांचे आभार मानतो, असे ते म्हणाले.