पूर्वभागातील बळळारी नाला परिसरातील भातपिके पाण्याखालीच
पुलामध्ये कचरा अडकल्याने पाणी जाण्यास अडथळा
वार्ताहर/सांबरा
सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी पूर्वभागातील बळळारी नाला परिसरातील भातपिके अद्याप पाण्याखालीच आहेत. निलजी येथे बळळारी नाल्यावर असलेल्या जुन्या पुलामध्ये कचरा अडकल्याने पाण्याचा निचरा न होता थेट पाणी शिवारात पसरले आहे. त्यामुळे पुराचे पाणी मोठ्याप्रमाणात शिवारात पसरल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे. निलजीतून सांबरा रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी बळळारी नाल्यावर एक पूल बांधला होता. मात्र त्या पुलाचा वापर होत नसल्याने सदर पूल तेथून हटविण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार केली आहे. तरीदेखील हा पूल हटविण्यात न आल्याने सध्या त्या पुलामुळे अडचण निर्माण झाली आहे. त्या पुलांमध्ये मोठ्याप्रमाणात कचरा अडकला आहे. त्यामुळे नाल्यातील पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाला असून नाल्याला आलेल्या पुरामुळे निलजी परिसरातील सुमारे चारशे एकरहून जास्त शेती पाण्याखाली गेली आहे. तरी प्रशासनाने हा कुचकामी पूल वेळीच हटवावा, अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे माजी उपाध्यक्ष किरण पाटील यांनी शेतकऱ्यांच्या वतीने केली आहे.