मतदान जागृतीसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
मतदानाचे महत्त्व जाणून घ्या : बलराम चव्हाण
खानापूर : तरुण जसे क्रिकेटला महत्त्व देतात त्याचप्रमाणे देशाच्या लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे. संविधानाने आम्हाला मतदानाचा हक्क दिलेला आहे. हा हक्क तुम्हाला देशाचे भविष्य घडवण्याचा अधिकार देते. यासाठी तरुण मतदारांनी जागरुकतेने मतदान करावे, तसेच आसपासच्या मतदारांनाही मतदानासाठी प्रवृत्त करावे, असे वक्तव्य खानापूर मतदार संघाचे निवडणूक अधिकारी बलराम चव्हाण यांनी केले. जिल्हा स्वीप कमिटी,, नगरपंचायत, युवा व क्रीडा विभागाच्यावतीने शहरातील मलप्रभा स्टेडियमवर शुक्रवारी युवा मतदारांसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. मतदार जागृतीच्या कार्यक्रमावेळी तालुका स्वीप कमिटीच्या अध्यक्षा भाग्यश्री जहांगीरदार म्हणाल्या की, लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे गरजेचे आहे. देशाच्या विकासात योगदान देण्याबरोबरच त्यांचे घटनात्मक अधिकार आणि कर्तव्ये पार पाडण्याची जबाबदारीही तरुणांची आहे. तरुणांनी कोणत्याही इच्छा आणि प्रलोभनाला बळी न पडता मोठ्या संख्येने मतदान करावे. यानंतर स्पर्धकांना मतदानाची शपथ देण्यात आली. स्पर्धेत प्रथम क्रमांकाने विजयी झालेला केएलई पदवीपूर्व महाविद्यालय संघ विजेता ठरला. मराठा मंडळ पदवीपूर्व महाविद्यालयाने उपविजेतेपद पटकावले. दोन्ही संघांना पारितोषिक व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. 22 रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विजेत्या संघांची निवड करण्यात आली आहे. यावेळी अक्षरदासोहचे सहाय्यक महेश परीट, ता. पं. व्यवस्थापक श्रीकांत सोपडला, शंकर कम्मार, सुरेखा मिर्जी, बी. एन. चचडी यासह विविध खात्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.