शेतातील गवतासंबंधी कृती कार्यकम तयार करण्याचा आदेश
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
प्रत्येक वर्षी खरीप हंगामानंतर पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश राज्यातील शेतकरी पुढच्या रबी पेरणीसाठी आपल्या शेतातील गवत जाळत असल्याने दिल्ली शहरात प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे या गवताची, ते न जाळता कशी विल्हेवाट लावता येईल, यासंबंधीचा कृती कार्यक्रम समयबद्ध पद्धतीने साकारला जावा, असा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिला आहे.
हा आदेश प्रामुख्याने पंजाब आणि हरियाणाच्या प्रशासनांना देण्यात आला आहे. 1 जानेवारी 2024 ते 1 सप्टेंबर 2024 या कालावधीत या कार्यक्रमाची रुपरेषा साकारण्यात यावी, अशी सूचना राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष न्या. प्रकाश श्रीवास्तव यांनी केली. त्यांचा हा आदेश वातावरण गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाच्या अहवालानंतर देण्यात आला आहे. यंदा खरीप हंगामानंतर गवत जाळण्याच्या 36,632 घटना घडल्या होत्या. हा सर्व धूर दिल्लीत वाऱ्याच्या दिशेमुळे येत असल्याने देशाच्या राजधानीच्या या शहरात प्रचंड प्रदूषण निर्माण होते, असे तज्ञांचे मत आहे. सर्वोच्च न्यायालयानेही याची गंभीर दखल घेतली आहे. 15 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या कालखंडात गवत जाळण्याच्या प्रमाणात मोठी वाढ होते. गवत न जाळता त्याची विल्हेवाट लावण्याचा मार्ग शोधावा, किंवा गवत जाळण्याचे निश्चित वेळापत्रक तयार करुन सर्वांच्या शेतातील गवत एकाचवेळी जाळणे टाळावे, अशा अनेक सूचना तज्ञांनी केल्या आहेत. कापणीनंतर शेतात उरलेले गवत जाळताना दक्षता घ्यावी, अशीही सूचना करण्यात आली आहे.