बेळगावसह धारवाड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट
राज्यभरात आजपासून पावसाचा जोर वाढणार : किनारपट्टीसह 6 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्टची घोषणा
प्रतिनिधी/ .बेंगळूर
आजपासून राज्यभरात पावसाचा जोर वाढणार आहे. किनारपट्टीसह 6 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. कारवार, मंगळूर, उडुपी, चिक्कमंगळूर, कोडगू आणि शिमोगा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. बेळगाव आणि धारवाड जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तर म्हैसूर, मंड्या, हासन, चामराजनगर, हावेरी आणि गदग जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
बेंगळूर शहर, बेंगळूर ग्रामीण, चिक्कबळ्ळापूर, कोलार, तुमकूर, विजयनगर, यादगिरी, रायचूर, कोप्पळ आणि बिदरमध्ये हवामान खात्याने मध्यम पावसाचा अंदाज वर्तविला आहे. दरम्यान, यावेळी मंगळूर जिल्ह्यासह किनारपट्टीवर मान्सून नेहमीपेक्षा लवकर दाखल झाला आहे. रविवारी सकाळपासूनच जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसासोबत जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहेत. मंगळूर विद्यापीठ परिसरात शनिवारपासून वीज तारेवर झाड कोसळल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
सततच्या पावसामुळे मंगळूर जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. नेत्रावती, कुमारधारा आणि फाल्गुनी नद्या तुडूंब झाल्या असून शहराची पाण्याची समस्या दूर झाली आहे. चिक्कमंगळूर जिल्ह्यातील मलनाड भागात गेल्या 3 दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील कळसा, होरनाडू, कोप्प, शृंगेरी, बाळेहोन्नूर आणि मुळैय्यनगरी पर्वतरांगांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. परिणामी, तुंगा, हेमावती आणि भद्रा नद्यांमधून पाण्याची आवक वाढली आहे. कोट्टीगेहार आणि चार्मडीच्या आजूबाजूच्या परिसरातही मोठ्या प्रमाणावर पाऊस होत आहे. पावसामुळे रस्ता न दिसल्याने एक कार हेमावती उपनदीत कोसळली. स्थानिकांनी कारमधील प्रवाशांना वाचवल्याने सुदैवाने जीवितहानी टळली आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे.