For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अलमट्टी विरोध योग्यच ! पण स्थानिक कारणांचं काय ?

11:42 AM May 20, 2025 IST | Radhika Patil
अलमट्टी विरोध योग्यच   पण स्थानिक कारणांचं काय
Advertisement

कोल्हापूर  / संतोष पाटील : 

Advertisement

जिल्ह्यात 2019 आणि 2021 मध्ये आलेल्या महापुराचा सर्वाधिक फटका 375 गावांना बसला. सुमारे चार लाख लोकांना घरे सोडावी लागली. 15 लाखांहून अधिक लोक बाधित झाले तर शेकडो घरांची पडझड झाली. 2019 मध्ये पाचशे हून अधिक गाय, म्हैशीचा जीव गेला. जिह्यातील 1 लाख 65 हजार हेक्टर जमिनीवरील पिके पाण्यात गेली. महापुराने 45 टक्के जिल्हा आणि 80 टक्के कोल्हापूर शहर बाधित होते. महापूर ही नैसर्गिक आपत्ती असली तरी त्याला फक्त अलमट्टी धरणालाच जबाबदार धरून कसे चालेल? महामार्गावरील भराव, नदी पात्रातील बांधकामे, गाळाने भरलेले नाले, नैसर्गिक प्रवाहातील अडथळे आदी दूर केले तर आणि तरच महापूर सुसह्य होईल. एकट्या अलमट्टीच्या नावाने खडे फोडून महापूराच्या समस्येतून सुटका अशक्य आहे.

  • शहरात 300 किलोमीटरचे रस्ते होतात बाधित

महापूर आणि अतिवृष्टीमुळे दरवेळी शहरातील तब्बल 299.77 किलोमीटरचे रस्ते खराब, बाधित होतात. या रस्त्याची डागडुजी करण्यासाठी कोट्यावधींचा खर्च केला जातो. दरवर्षी महापूर आणि अतिवृष्टीने कारण सांगून खाबूगिरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अतिवृष्टी आणि महापुराचे कारण सांगत सुमार दर्जाच्या रस्त्याचे काम झाकोळून टाकण्याचाही प्रयत्न होतो. अतिवृष्टी आणि महापुराच्या तडाख्यात टिकाव धरतील अशाच प्रकारच्या रस्त्यांची बांधणी कधी होणार?

Advertisement

  • नाले सफाई कासवछाप

महापालिकेने पावसाळी नाले सफाई आणि स्वच्छतेची कामे पूर्ण केली नसल्याने त्याचा पाण्याच्या निचऱ्यावर परिणाम होतो. एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पांर्तगत शहरात 98 किलोमीटरच्या नाल्यांतील गाळ तसाच आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात खरमाती आणि कचरा साचल्याने अनेक ठिकाणी ते बंदच आहेत. 75 कोटी रुपये खर्चून केलेली पावसाळी पाणी वहन यंत्रणा कुचकामी ठरली आहे. शहरामध्ये साचणारे पावसाचे पाणी आणि सांडपाणी वाहून नेण्यासाठी नदी, नैसर्गिक नाले अणि रोडसाईड चॅनेल, गटर्स आहेत. तसेच 350 नाल्यांचे पर्जन्यछायेखालील क्षेत्र मोठे असून पावसाळ्यात यातून मोठा प्रवाह वाहतो. शहरातील 81 प्रभागांपैकी 33 प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर महापुराचे पाणी शिरते. शहरात सुमारे लहान-मोठ्या 350 नाल्यांतील युध्दपातळीवर गाळ काढून पाणी वहन क्षमता वाढवण्याची गरज आहे.

  • भराव कधी काढणार?

रेड झोन, ग्रीन झोनमधील बांधकामांचे सर्वेक्षण करण्याची गरज आहे. नदीकाठावर मोठ्या प्रमाणात टाकलेला भराव काढून नदीचा नैसर्गिक प्रवाह सुलभ कधी होणार? कसबा बावडा-शिये रस्ता, वडणगे रस्ता, आंबेवाडी ते खुपीरे रस्ता आदी महामार्गाला खेटून नदीपात्रात दुकाने आणि मंगल कार्यालयांची लाईनच तयार झाली आहे. पाण्याचड फुग वाढवण्यास नदी पात्रातील बांधकामे कारणीभूत ठरत आहेत.

  • धोक्याची घंटा

पुराचा अभ्यास न करता टाकलेला नाले आणि नदी भोवतालाचा भराव, प्रमुख 13 नाल्यांसह 350 लहान-मोठ्या नाल्यात भरलेला गाळ आणि कमी झालेली रुंदी, बुजलेले लहान नाले, अवास्तव झालेले नागरीकरण, रस्ते प्रकल्पामुळे शहराची वाढलेली दोन फुटांनी उंची, पावसाळी पाणी नियोजनाचा उडालेला फज्जा, अतिरिक्त पाणी वाहून नेण्याची नसलेली सोय, चॅनेल्स, गटारींची अपुरी क्षमता आदींमुळे शहरवासीय जलमुखावर असल्याचे अधोरेखित झाले. दोन वेळा निसर्गाने कोल्हापूरकरांना धोक्याची घंटा दिली. आता तरी निसर्गाची चाहुल ओळखून प्रशासनाने वेळीच उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

  • दुषीत पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेचा प्रश्न

पंचगंगेच्या पुरामुळे महापालिकेची जल शुध्दीकरण यंत्रणा कोलमडून पडते. शहरातील सर्व भागात पाणीपुरवठा यंत्रणा मोडून पडते. पंधरा-पंधरा दिवस टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. नंतरही अनेक दिवस नळाला गाळ मिश्रीत पाणी येत आहे. दुषीत पाणी पुरवठ्यामुळे गॅस्ट्रो, सर्दी, खोकला, ताप आदी जलजन्य आजारांचा सामना करावा लागणार लागतो. वीजपुरवठा खंडीत होतो. महापुरानंतर सर्वत्र घाणीचे साम्राज्य असते. 2019 ची आपत्ती नजरेपुढे ठेवून पूरबाधित भागातील स्वच्छता, आरोग्य, पाणी आणि वीजपुरवठ्याचे नियोजन कधी होणार ?

  • नियमावली कागदावरच

बंदिस्त किंवा खुल्या असलेल्या नाल्याभोवती बांधकाम करताना किती जागा सोडायची, याचे निकष ठरलेले आहेत. बंदिस्त, लहान आकाराच्या नाल्याशेजारी बांधकाम करताना किमान साडेचार मीटर अंतर दोन्ही बाजूंनी सोडणे बंधनकारक आहे. जयंती नाला आणि इतर मोठ्या बंदिस्त नाल्यावर बांधकाम करताना काठपासून 9 मीटर जागा सोडणे आवश्यक आहे. मात्र, नाल्याशेजारी बांधकाम करताना त्याची सर्रास पायमल्ली झाल्याची उदाहरणे आहेत.

  • या उपाययोजनांची गरज

महापूर काळात अखंडीत पाणी आणि वीज पुरवठा, पाणी उपसा यंत्रणा संभाव्य पूररेषेबाहेर असावी.

वीज ट्रान्सफॉर्मर उंचीवर करणे

पेट्रोल-डिझेल, गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा

अतिवृष्टीचा अंदाजानुसार नदीबुडीत पिकांत बदल

पूरबाधित नागरी क्षेत्रातून सुरक्षितरित्या स्थलांतर व्यवस्था

प्रमुख नाल्यातील गाळ काढून जलवहन क्षमता वाढवणे.

महापूर गृहीत धरुन खास निधीची तरतूद

जयंती नाल्याची उगमापासून शेवटपर्यंत गाळ काढून खोली वाढवणे.

12 नाल्यांतील गाळ काढून वहन क्षमता वाढवणे

काटकोनात वळवलेल्या नाल्यांना नैसर्गिक प्रवाह देणे

बंदिस्त नाले खुले करणे

पाणी अडवणाऱ्या नाल्यावरील बांधकामे हटवणे

Advertisement
Tags :

.