For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हैतीमधील भारतीयांसाठी ‘ऑपरेशन इंद्रावती’

06:42 AM Mar 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
हैतीमधील भारतीयांसाठी ‘ऑपरेशन इंद्रावती’
Advertisement

भारतीयांना डॉमिनिक प्रजासत्ताक येथे हलविले : हैतीमध्ये हिंसा, मोठ्या प्रमाणात जीवितहानी

Advertisement

वृत्तसंस्था/ पोर्ट औ प्रिन्स

भारत सरकारने हैतीमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन इंद्रावती सुरू केले आहे.  याच्या अंतर्गत गुरुवारी रात्री उशिरा 12 भारतीयांना कॅरेबियन बेट डॉमिनिकल रिपब्लिक येथे नेण्यात आल्याची माहिती विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी दिली आहे. हैतीमध्ये 23 दिवसांपासून हिंसा सुरू असून रस्त्यांवर मृतदेहांचा खच निर्माण झाला आहे.

Advertisement

हैतीमधील स्वत:च्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताने ऑपरेशन इंद्रावती सुरू केले आहे. यानुसार 12 भारतीयांना तेथून बाहेर काढत डॉमिनिक रिपब्लिक येथे पाठविण्यात आले. आम्ही विदेशांमध्ये राहत असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी पूर्णपणे प्रतिबद्ध आहोत. डॉमिनिकल रिपब्लिकच्या सरकारने समर्थन दिल्याबद्दल आम्ही त्याचे आभार मानतो असे जयशंकर यांनी म्हटले आहे.

4 हजार कैदी फरार

कॅरेबियन देश हैतीमध्ये मार्चच्या प्रारंभापासून हिंसा होत आहे. 29 फेब्रुवारी रोजी देशातील गुन्हेगारी टोळ्यांनी अनेक शासकीय संस्थांवर हल्ले केले होते. तसेच तुरुंगावरही हल्ला केला होता, यानंतर 4 हजार कैदी फरार झाले होते. हे शस्त्रसज्ज लोक देशाच्या अनेक हिस्स्यांमध्ये जाळपोळ करत आहेत. तसेच दुकाने आणि घरांमध्ये तोडफोड करत आहेत.

भारतीयांना बाहेर काढण्याची तयारी

हैतीमधील भारतीय नागरिकांना तेथून बाहेर काढण्याची तयारी आहे. हैतीमध्ये संकट असून गरज भासल्यास आम्ही आमच्या लोकांना तेथून बाहेर काढू. याकरता विदेश मंत्रालयात एक नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. तसेच हेल्पलाइन क्रमांकही जारी करण्यात आल्याची माहिती विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैसवाल यांनी 15 मार्च रोजी दिली होती.

भारत सरकारची नजर

हैतीमधील भारतीय नागरिकांच्या सुरक्षा चिंता पाहता सरकार तत्पर आहे. डॉमिनिक रिपब्लिकची राजधानी सँटो डोमिंगोमधील दूतावास स्थितीवर नजर ठेवून आहे. तसेच विदेश मंत्रालय देखील स्थितीवर पूर्णपणे नजर ठेवून असल्याचे जैसवाल यांनी स्पष्ट केले होते.

हैतीमध्ये नाही दूतावास

हैतीमध्ये भारताचा दूतावास नाही. यामुळे शेजारी देश डॉमिनिक प्रजासत्ताकची राजधानी सँटो डोमिंगो येथूनच भारत सरकारच्या मार्फत नागरिकांना हैतीमधून बाहेर काढण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे.

हैतीच्या पंतप्रधानांचा राजीनामा

हैतीचे पंतप्रधान एरियल हेन्री यांना राजीनामा देयणसाठी भाग पाडण्याच्या उद्देशाने विविध गुन्हेगारी टोळ्यांनी देशातील प्रमुख संस्थांवर हल्ले केले होते. या हल्ल्यांमुळे देशाची स्थिती पूर्णपणे बिघडली आहे. तर हिंसा पाहता पंतप्रधान एरिरल हेन्री यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. तरीही देशातील स्थिती पूर्ववत होण्याची चिन्हे नाहीत. यामुळे अनेक देशांनी तेथून स्वत:च्या नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

Advertisement
Tags :

.