तेव्हाच मानवजात झाली असती नष्ट...
कधी ना कधी मानवजात नष्ट होईल, हा संशय मानवाला फार पूर्वीपासून भेडसावत आहे. अर्थात ही भीती अनाठायी मुळीच नाही. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार मानवजातीच्या इतिहासात असे अनेक प्रसंग आले आहेत, की मानवजात सर्वनाशाच्या उंबरठ्यापर्यंत जाऊन परत आली आहे. अशीच एक घटना साधारणत: 74 हजार वर्षांपूर्वी घडली होती. पण मानवजात धोक्यातून वाचली.
इंडोनेशिया देशाच्या सुमात्रा बेटावर 74 हजार वर्षांपूर्वी एका अतिशक्तीशाली ज्वालामुखीचा स्फोट झाला होता. या स्फोटातून उडालेली राख पृथ्वीभर पसरली होती आणि त्यामुळे त्यावेळी असणारी मानव प्रजाती संपूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर होती. प्राणीसृष्टी पुष्कळशी संपली होती. केवळ वृक्ष आणि वनस्पतींनी टिकाव धरला होता. मानवाला पोट भरण्यासाठी पुरेसे अन्न मिळण्याची मारामार होत होती. तरीही मानवजात संपण्यापासूच वाचली. यासाठी माणसाने विकसीत केलेले एक कौशल्य उपयोगी पडले होते. हे कौशल्य होते मस्याहार करण्याचे.
अन्न कमी पडू लागल्यानंतर त्यावेळच्या मानवाने जगण्यासाठी पाण्यातील मासे पकडून त्यांचा आहारात उपयोग करण्यास प्रारंभ केला. त्यामुळे त्याची अन्नाची आवश्यकता पूर्ण झाली. कालांतराने ज्वालामुखीच्या स्फोटाचा घातक परिणाम टप्प्याटप्प्याने कमी झाल्यानंतर मानवी जीवन पृथ्वीवर स्थिरस्थावर झाले होते आणि त्यानंतरच्या काळात मानव प्रजातीची जोमदार प्रगती झाली. अशा प्रकारे त्यावेळची माणसे आणि त्यांच्या पुढच्या पिढ्या जगल्या, वाढल्या आणि प्रगत झाल्या. संशोधकांच्या म्हणण्यानुसार असे कित्येक घटना घडल्या आहेत. प्रत्येक घटनेची सविस्तर माहिती आपल्याला नाही. पण एकंदरीत आपण सुदैवी आहोत.