जो इंद्रियांवर ताबा मिळवतो त्याची प्रज्ञा स्थिर होते
अध्याय पहिला
बाप्पा राजाला म्हणाले, सगळ्यांच्यात माझं बीज पहायला शिक म्हणजे तुझ्यातील आपपर भाव आपोआप कमी होईल. मनुष्याने त्याच्या मनातील सुख-दु:ख, क्रोध, हर्ष, भीती या भावभावनांचे ठिकाणीही समान असावे. आत्मा ही आपली खरी ओळख असून आत्म्याचा शरीराशी काहीही संबंध नसतो म्हणून शरीराला जाणवणाऱ्या सुखदु:खाच्या प्रसंगी तू त्यापासून अलिप्त रहा. बाप्पा पुढं म्हणाले, सगळ्यात मी सारख्या प्रमाणात आहे हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवं. हे जो लक्षात घेईल तो सूर्य, चंद्र, उदक, अग्नि, शिव, शक्ति, वायु, ब्राह्मण, हृदय, महानदी, तीर्थ, पापनाशक क्षेत्र, विष्णु, सर्व देव, यक्ष, नाग, गंधर्व, मनुष्य, पशु, पक्षी इत्यादि मनुष्येतर जीव यांचे ठिकाणी मी स्थित आहे हे लक्षात घेऊन नेहमीच जो मला त्यांच्यात पाहतो त्याला योगी म्हणतात कारण तो योगावित् म्हणजे योगज्ञानी असतो. त्यामुळे तो माझ्याशी सदैव जोडला गेलेला असतो. शब्द, स्पर्श इत्यादि अर्थांपासून इंद्रिये विवेकाने मागे ओढून घेऊन सर्वत्र समत्वबुद्धि ठेवणे हा योग, राजा, मला संमत आहे ह्या अर्थाचा पुढील श्लोक आपण अभ्यासत आहोत.
संपराहृत्य स्वार्थेभ्य इन्द्रियाणि विवेकत ।
सर्वत्र समताबुद्धि स योगो भूप मे मत: ।। 47 ।।
त्यानुसार सगळ्यात सम प्रमाणात असलेल्या बाप्पांचे अस्तित्व जो पाहतो त्याचा त्याच्या ज्ञानेन्द्राrयांवर ताबा असल्याने तो त्यांच्याशी सदैव जोडला गेलेला असतो. ज्ञानेन्द्राrयांवर ताबा म्हणजे काय ते आपण पाहू. कान, नाक, डोळे, त्वचा, जीभ ही आपली ज्ञानेंद्रिये आहेत. आपल्या आवडत्या गोष्टी त्यांच्या कक्षेत आल्या की त्या गोष्टींचे ज्ञान ती आपल्याला करून देत असतात. समजा आपण मिठाईच्या दुकानात गेलो आणि आपल्याला आवडणारी मिठाई दिसली की आपले डोळे त्या मिठाईच्या रंगरुपाकडे आपले लक्ष वेढून घेतात. आपली त्वचा त्या मिठाईच्या मुलायम स्पर्शाची आपल्याला आठवण करून देते तसेच आपली जीभ आपल्याला तिच्या स्वादमाधुर्याची आठवण करून देते. ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम होऊन आपल्याला ती मिठाई विकत घेण्याची तीव्र इच्छा होते. अशाप्रकारे ज्ञानेंद्रियांचे कार्य चालून मनाला मोहवणाऱ्या अनेक गोष्टींची भुरळ ती आपल्याला घालत असतात. त्या गोष्टी मिळवण्याच्या नादात बऱ्याच वेळा आपण वाहवत जातो. त्यामुळे आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचा विसर पडतो. असे होऊ नये म्हणून साधकाने ज्ञानेंद्रियांवर ताबा ठेवला पाहिजे. त्यामुळे त्याच्या भल्याच्या असलेल्या गोष्टींचा त्याच्या इच्छेनुसार तो लाभ घेऊ शकेल. डोळ्यांनी ईश्वराच्या मूर्तीचे दर्शन घेणे, कानांनी त्याच्या लीलांच्या कथा ऐकणे, नाकाने कापुरादि उत्तम पुजासाहित्याचा वास घेणे, जिभेने दैवी प्रसादाचा स्वाद चाखणे अशा काही गोष्टी त्याला ईश्वराशी जोडले जाण्यासाठी सहाय्यभूत होऊ शकतील. कासव ज्याप्रमाणे धोका दिसताच अंग आक्रसून घेते त्याप्रमाणे साधकाने ज्ञानेंद्रिये बाह्य वस्तूंची भुरळ घालून आपल्याला भ्रमिष्ट करत आहेत हे लक्षात आल्याबरोबर त्यांना आवरून धरावे.
भगवंत भगवद्गीगीतेत म्हणतात,
घेई ओढूनि संपूर्ण विषयातूनि इंद्रिये ।
जसा कासव तो अंगे तेंव्हा प्रज्ञा स्थिरावली ।।2.58 ।।
वाट्याला येईल त्या परिस्थितीत जो समाधानी राहील त्याचा त्याच्या इंद्रियांवर ताबा राहतो आणि जो ह्याप्रमाणे इंद्रियांवर ताबा मिळवतो त्याची प्रज्ञा स्थिर होते. अशा स्थितप्रज्ञ झालेल्या योग्याला सर्वत्र ईश्वराचे म्हणजे बाप्पांचे अस्तित्व जाणवत असते. असा योग जो साधतो तो बाप्पांशी जोडला जात असल्याने बाप्पांना तो योग उत्तम योग म्हणून मान्य आहे.
क्रमश: