एका दिवशी, एका वेळी गोवा गाणार ‘वंदे मातरम्’
शुक्रवार 24 रोजी राष्ट्रगानाचा विशेष उपक्रम : ‘वंदे मातरम्’चा आतापर्यंतचा ठरणार विक्रम,विवेकानंद केंद्राच्या गोवा शाखेचे आयोजन,सर्वांनी सहभागी होण्याचे श्रीपादभाऊंचे आवाहन
पणजी : ‘वंदे मातरम्’ हा राष्ट्राचा महामंत्र आहे. येत्या शुक्रवारी 24 जानेवारी रोजी ‘वंदे मातरम्’ या महामंत्राला राष्ट्रगानाचा दर्जा प्राप्त होऊन 75 वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच यावर्षी या राष्ट्रगानाची 150 वर्षे म्हणजे सार्धशती पूर्ण होत आहे. या निमित्ताने विवेकानंद केंद्र कन्याकुमारी, गोवा शाखेच्या प्रयत्नांतून संपूर्ण गोव्यातील सर्व प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयात 24 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता एकाच वेळी संपूर्ण ‘वंदे मातरम्’ गायिले जाणार आहे. सामूहिक राष्ट्रभक्ती प्रकट होणाऱ्या या उपक्रमात गोव्यातील सर्व शिक्षण संस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ‘वंदे मातरम्’ सार्धशती समितीचे अध्यक्ष केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक व कार्यवाह वल्लभ केळकर यांनी केले आहे.
सर्वांनी सहभागी व्हावे
शुक्रवारी सकाळी 10 वाजता राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यात सुऊवातीला भारतमाता पूजन करून थोडक्यात ‘वंदे मातरम्’ विषयीची माहिती सर्व विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. यासंदर्भात शिक्षण खात्याने सर्व शैक्षणिक संस्थांना पाठवलेल्या पत्रात दिलेला गुगल फॉर्म सर्वांनी भरावा, आणि या ‘वंदे मातरम्’ गायनात सहभागी होणाऱ्या सर्व मुलांची व शिक्षकांची संख्या कळवावी भरावी, असे आवाहन श्रीपादभाऊ नाईक यांनी केले आहे. याबाबत काही माहिती पाहिजे असल्यास किंवा काही समस्या असल्यास त्यांनी तसेच सर्व शाळा प्रमुखांनी तालुका समन्वयकाकडे संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
तालुकानिहाय तालुक्यांचे समन्वयक खालीलप्रमाणे
- बार्देश पल्लवी मांद्रेकर 9359657733
- पेडणे प्रतिभा चुरी 9284268583
- तिसवाडी श्रुती बगळी 9145017507
- डिचोली रुपाली डोईफोडे 8275147144
- सत्तरी क्षमा मराठे 8275644503
- फोंडा प्रजय वझे 7507492448
- सांगे अनामिका वरक 7507056314
- धारबांदोडा अनामिका वरक 7507056314
- काणकोण वैभवी काणकोणकर 7517580588
- सासष्टी पूजा वझे 7499124152
- मुरगाव करुणा म्हावळिंगकर 9022494714
भारताचा इतिहास घडविला
भारत राष्ट्राची एकता दृढ करण्याचे सामर्थ्य ‘वंदे मातरम्’ या महामंत्रात आहे. ऋषी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या लेखणीतून ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रगान 7 नोव्हेंबर 1875 मध्ये अवतरले. यंदा या राष्ट्रगानाची 150 वी जयंती म्हणजे सार्धशती साजरी केली जात आहे. या एका गीताने आणि त्याच्या दोन शब्दांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास बदलला, नव्हे घडविला ! याचे स्मरण व्हावे, म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गोव्यात होणार मोठा विक्रम
या राष्ट्रगानाच्या सार्धशती निमित्ताने एकाच दिवशी, एकाच वेळी गोव्यातील सर्व शाळा व महाविद्यालयात संपूर्ण ‘वंदे मातरम’ होणार आहे आणि तो मोठा विक्रम गोव्याच्या इतिहासात होणार आहे. शालेय संस्थांबरोबरच इतरांनीसुद्धा आपल्या कार्यस्थानी ‘वंदे मातरम्’ गावे व ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.
वर्षभर होणार कार्यक्रम
सार्धशतीच्या या सुरुवातीच्या कार्यक्रमानंतर समितीच्या माध्यमातून वर्षभर विविध कार्यक्रम, उपक्रम केले जाणार आहेत. त्यासाठी केंद्रीय मंत्री श्रीपादभाऊ नाईक यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. वर्षभरात ‘वंदे मातरम्’ गायन स्पर्धा, वंदे मातरमवर नृत्य सादरीकरण, प्रश्नमंजुषा, प्रदर्शनी चर्चासत्र, देखावे, अभिवाचन कार्यक्रम, व्याख्याने, प्रभात फेरी, रांगोळी, चित्रकला स्पर्धा अशा कार्यक्रमांचा समावेश असणार आहे.