‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्ताव चुकीचा : खर्गे
उच्चस्तरीय समितीला लिहिले पत्र
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ‘एक देश, एक निवडणूक’च्या मुद्द्यावर सरकारकडून स्थापन उच्चस्तरीय समितीला पत्र लिहिले आहे. संसदीय शासन व्यवस्थेला स्वीकारणाऱ्या देशात एकाचवेळी निवडणूक घेण्याच्या कल्पनेला कुठलेच स्थान नाही तसेच आमचा पक्ष ‘एक देश, एक निवडणूक’च्या विचाराला तीव्र विरा करत असल्याचे खर्गे यांनी या पत्रात नमूद पेले आहे.
एकाचवेळी निवडणुका करविण्याचा विचार घटनेच्या मूळ चौकटीच्या विरुद्ध आहे. एकत्रित निवडणुकीची व्यवस्था लागू करायची असल्यास घटनेच्या मूळ संरचनेत पुरेसे बदल करण्याची गरज भासणार आहे. ज्या देशात संसदीय शासन प्रणाली स्वीकारण्यात आली आहे, तेथे एकत्रित निवडणुकीच्या कल्पनेला कुठलेच स्थान नाही. सरकारकडून एकत्रित निवडणुकीचे असे प्रारुप घटनेत नमूद संघवादाच्या हमीच्या विरोधात असल्याचा दावा खर्गे यांनी संबंधित समितीच्या सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून सूचनांसाठी मागील वर्षी 18 ऑक्टोबर रोजी काँग्रेस अध्यक्षांना पत्र लिहिले गेले होते. खर्गे यांनी 17 मुद्द्यांमध्ये स्वत:च्या सूचना समितीला केल्या आहेत.
घटना आणि संसदीय लोकशाहीला नष्ट करण्यासाठी केंद्र सरकारला माजी राष्ट्रपतिंच्या पदाचा गैरवापर करू देऊ नका अशी विनंती मी उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्षांना (कोविंद) करत आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ‘एक देश, एक निवडणूक’च्या योजनेला तीव्र विरोध करत आहे. एक समृद्ध आणि मजबूत लोकशाही कायम ठेवण्यासाठी एक देश एक निवडणुकीची कल्पना सोडून देणे आवश्यक असल्याचे खर्गे यांनी पत्रात नमूद पेले आहे.