मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात?
मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये आज किंवा उद्या शिक्कामोर्तब : निवडीसाठी जोरदार हालचाली
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, जयपूर
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा होत आला तरी भाजपची मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील मुख्यमंत्री निवड रखडली आहे. सध्या तिन्ही राज्यांमध्ये एकापेक्षा जास्त नेत्यांची नावे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्यामुळे अंतिम घोषणा लांबत चालली आहे. संभाव्य मुख्यमंत्री म्हणून ओळखले जाणारे नेते ‘सर्व काही हायकमांड ठरवेल’ असे सांगत आहेत. आता हायकमांडने म्हणजेच नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जे. पी. न•ा यांनी तिन्ही राज्यांसाठी पक्षनिरीक्षक नियुक्त केले आहेत. हे निरीक्षक राज्यातील स्थिती जाणून घेत पक्षश्रेष्ठींना अहवाल सादर करतील. त्यानंतर आज-उद्या, रविवारी किंवा सोमवारी मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यांमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा पुढे न करता केवळ पंतप्रधान मोदींचे नेतृत्त्व पुढे करत मते मागण्यात आली. त्यामुळेच राज्यात मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी कोणत्याही एका नेत्याचे नाव तातडीने निश्चित होऊ शकले नाही. साहजिकच दावेदारांची संख्या वाढत गेली. मात्र, मुख्यमंत्रीपदाची निवड करण्यास उशीर होण्याच्या गणितामुळे बड्या नेत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. जेव्हा-जेव्हा भाजपला मुख्यमंत्री निवडण्यासाठी 5 दिवसांपेक्षा जास्त वेळ लागला तेव्हा पक्षाने जुन्यापेक्षा नवीन चेहऱ्याला प्राधान्य दिल्याचा इतिहास आहे. आता यावेळीही तिन्ही राज्यांना ‘नवीन चेहरा’ मिळण्याची संभावना व्यक्त होत आहे.
राजस्थानमध्ये सस्पेन्स वाढला
राजस्थानचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? हा प्रश्न अजूनही कोडेच आहे. नव्या मुख्यमंत्र्याबाबतचा सस्पेन्स वाढत चालला आहे. नवनवीन नावांची सातत्याने चर्चा होत आहे. यापूर्वी या शर्यतीत वसुंधरा राजे आणि योगी बालकनाथ यांच्या नावाचा विचार केला जात होता. मात्र मोदी मंत्रिमंडळात समाविष्ट असलेले अश्विनी वैष्णव यांचे नाव सध्या आघाडीवर असल्याचे मानले जात आहेत. भाजपने विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. अशा स्थितीत विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर लवकरच मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित होईल, अशी अटकळ बांधली जात आहे. या शर्यतीत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे नाव अधिकाधिक आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. तसेच केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, किरोरी लाल मीणा, राज्यवर्धन सिंह राठोड आणि दिया कुमारी यांचीही नावे या शर्यतीत आहेत. मात्र आता राजकारणात वैष्णव यांच्या नावाबाबत सर्वाधिक चर्चा आहे. जुन्या म्हणजेच माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना पुन्हा संधी देण्याची शक्यताही मावळली आहे.
मध्यप्रदेशची कमान कोणाकडे?
मध्यप्रदेशात भाजपचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबतही संभ्रमावस्था कायम आहे. भाजपच्या हायकमांडने मुख्यमंत्री निवडण्यासाठी 3 निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना निरीक्षक बनवण्यात आले आहे. केंद्रीय नेतृत्वाने माझ्यावर निरीक्षक पदाची जबाबदारी दिली असून सोमवारी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नवनिर्वाचित आमदारांशी चर्चा केल्यानंतर सर्व निर्णय एकमताने घेतले जातील, असेही ते म्हणाले. विद्यमान मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा दावा प्रबळ मानला जात असला तरी राज्यात नेतृत्व बदलाबाबतही पक्षांतर्गत मतप्रवाह आहेत. राज्यात नव्या चेहऱ्यालाच संधी देण्याचा पक्षांतर्गत विचार सुरू आहे. मध्यप्रदेशात शिवराजसिंह चौहान यांच्याशिवाय प्रल्हाद पटेल, ज्योतिरादित्य सिंधिया, सुमित्रा वाल्मिकी, सुमेर सोलंकी हे प्रबळ दावेदार आहेत. याशिवाय हिमाद्री सिंग, वीरेंद्र खाटिक आणि संध्या राय यांच्या नावाचीही चर्चा आहे.
छत्तीसगडचा तिढाही कायम
छत्तीसगडमध्ये रमण सिंग यांच्याशिवाय रेणुका सिंग, ओ. पी. चौधरी आणि अऊण साओ हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार आहेत. मोहन मरांडी, धरमलाल कौशिक आणि रामविचार नेताम यांच्या नावाचीही चर्चा आहे. छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री निवडीसाठी भाजपने अर्जुन मुंडा, सर्बानंद सोनोवाल आणि दुष्यंत गौतम यांना निरीक्षक म्हणून पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. हे निरीक्षक नवनिर्वाचित आमदारांशी चर्चा करून मुख्यमंत्री कोणाला करायचे यासंबंधीचा अहवाल हायकमांडना सादर करतील. आज, रविवारी दुपारी 12 वाजता विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे.
मुख्यमंत्री निवड लांबणीवर का?
- गेल्या 20 वर्षात पहिल्यांदाच राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपने मुख्यमंत्री पदाशिवाय निवडणूक लढवली होती. भाजपची ही योजना तिन्ही राज्यात कामी आली आल्यामुळे पक्षाला मुख्यमंत्री ठरवण्यात अडचण येत आहे.
- गेल्या दोन दशकांपासून भाजपचे राजकारण राजस्थानमध्ये वसुंधरा राजे, छत्तीसगडमध्ये रमणसिंह आणि मध्यप्रदेशात शिवराजसिंह चौहान यांच्याभोवती फिरत आहे. हायकमांडला आता ते संपवायचे असल्याचे बोलले जात आहे.
- राजस्थानमध्ये वसुंधरा राजे आणि मध्यप्रदेशात शिवराज सिंह चौहान यांची स्थिती मजबूत आहे. लोकसभा निवडणुका जवळ आल्याने भाजपला घाईघाईत कोणताही निर्णय घ्यायचा नाही.