For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निमित्त पहिल्या जलभुयारी

06:52 AM Mar 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
निमित्त पहिल्या जलभुयारी
Advertisement

मेट्रोच्या उद्घाटनाचे... पश्चिम बंगालमधील आणि भारतातील पहिल्यावहिल्या पाण्याखालील म्हणजेच जलभुयारी मेट्रो रेल्वेचे उद्घाटन काही दिवसांपूर्वी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. 4965 कोटी रुपयांचा खर्च या पहिल्यावहिल्या मेट्रो रेल्वेसाठी करण्यात आला असून यामुळे भविष्यात एकदा का रेल्वे सेवा नियमित सुरु झाली की हावडा आणि कोलकाता यामधील होणारी गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. 30 मीटर पाण्याखाली रेल्वे मार्ग उभारण्यात आला असून त्याची लांबी 4.8 किलोमीटर इतकी आहे. सध्याला या रेल्वेचे प्रायोगिक तत्त्वावरती उद्घाटन करण्यात आले असून लवकरच प्रवाशांसाठी ही सेवा बहाल केली जाणार आहे. कोलकात्यातील हावडा मैदान ते एसप्लनडे या दरम्यान देशातील नदीतील पहिलीवहिली मेट्रो रेल्वे सुरू झाली असून बांधकाम तंत्रज्ञानाचा उत्तम नमुना म्हणून याकडे पाहिले जात आहे.

Advertisement

सध्या हीच मेट्रो रेल्वे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. रेल्वेच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे. 2022-2023 या वर्षामध्ये मेट्रो प्राधिकरणाने विक्रमी स्तरावरती 14 कि. मी. चे काम पूर्ण केले आहे. यापूर्वी कोलकात्यामध्ये 1984 ते 2014 या कालावधीमध्ये फक्त 27 कि. मी. चे काम करण्यात आले होते. त्या तुलनेने पाहता मागच्या वर्षी करण्यात आलेले काम विक्रमी स्तरावरचे मानले जात आहे. 520 मीटर लांबीच्या बोगद्याचे काम विक्रमी 67 दिवसांमध्ये पूर्ण करण्यात आले आहे. देशातील सर्वाधिक खोलीचे मेट्रो स्टेशनही बांधण्यात आले आहे. या मेट्रो स्टेशनच्या प्रकल्पाचे काम अफकॉन्स या दिग्गज कंपनीने केले असून 159 वर्षे जुनी असणारी शापुरजी पालोनजी या समुहाची ती सहकारी कंपनी आहे.

देशासह विदेशातही या कंपनीने उत्तम असे प्रकल्प पूर्ण केले आहेत. अलीकडेच पंतप्रधान मोदींच्या हस्ते अबुधाबी येथील उद्घाटन झालेले अक्षरधाम मंदिर याच समुहाने बांधले आहे. 1865 साली पालोनजी मिस्त्री यांनी समुहाची स्थापना केली. आज या समुहात 15 कंपन्यांचा समावेश आहे. एसपी इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन, फोर्ब्ज अँड कंपनी आणि अफकॉन्स इन्फ्रा यांचाही समावेश यात आहे. अभियांत्रिकी, पायाभूत सुविधा, बांधकाम, बंदर विकास, ऊर्जा व पाण्यासंदर्भातील प्रकल्प, वित्तसेवा, हॉस्पिटॅलिटी आणि रहिवासी बांधकाम प्रकल्प अशा विविध प्रकल्पांमध्ये समुहाचे योगदान आहे. 40 पेक्षा अधिक देशांमध्ये समूह व्यवसाय करत असून 35 हजारपेक्षा अधिक लोक सेवेत आहेत. या समुहाची टाटा सन्समध्ये 18 टक्के हिस्सेदारी आहे. एसपी इंजिनिअरिंग देशातील पहिलीवहिली आयएसओ 9001-2000 प्रमाणीत बांधकाम कंपनी आहे.

Advertisement

गुजरातमधील मारुती आणि फोर्डचा कारखाना, मुंबईतील ताजमहल हॉटेल, ब्रेबॉन स्टेडियम, पुण्यातील एमसीए स्टेडियम यांचे काम कंपनीने केले आहे. तर दुसरीकडे अफकॉन्स इंटरनॅशनल या कंपनीने आशिया, आफ्रिका आणि मध्यपूर्वेतील 25 हून अधिक देशांमध्ये आव्हानपूर्वक असे प्रकल्प पूर्ण केले आहेत. 1959 पासून पाहता कंपनीने 350 हून अधिक पायाभूत सुविधांचे प्रकल्प पूर्ण केले आहेत. मरीन, एलएनजी आणि मेट्रो रेल विभागामध्ये प्रकल्प राबविण्यामध्ये आघाडीवरची कंपनी म्हणून ख्याती पावलेली आहे. नागपूर मेट्रो, कानपूर मेट्रो, अटल टनेल, चिनाबचा रेल्वे पूल, मुंबई-नागपूर एक्स्प्रेस वे, कोलकाता पूर्व-पश्चिम मेट्रो असे महत्त्वाचे प्रकल्प राबविले आहेत. चिनाब रेल्वे पूल तर जगातला दुसरा सर्वात उंच असा पूल असून अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये त्याचे कौतुक होते आहे.

Advertisement
Tags :

.