For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शनिवारी पहाटेच मनपा आयुक्त रस्त्यावर

11:38 AM Jul 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
शनिवारी पहाटेच मनपा आयुक्त रस्त्यावर
Advertisement

रस्ते-नाल्यांची पाहणी करून दुरुस्त करा : कचऱ्याचीही उचल वेळेत करण्याची सूचना

Advertisement

बेळगाव : सध्या सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. याचबरोबर काही ठिकाणी पाणीदेखील साचून आहे. याची माहिती महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांना मिळाल्यानंतर त्यांनी शनिवारी पहाटेच शहरातील विविध भागांना भेट देऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. नानावाडी येथील काही भागात पाणी साचून आहे. पाण्याचा निचरा योग्यप्रकारे होत नसल्यामुळे त्या पाण्याचा निचरा करण्याबाबत अशोक दुडगुंटी यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. सदाशिवनगर येथील वाहनाच्या गोडावूनला पहाटे भेट दिली. त्या ठिकाणी किती कर्मचारी उपस्थित आहेत, याची पाहणी केली. याचबरोबर कार्यालयात जाऊनही संपूर्ण माहिती घेतली आहे. नादुरुस्त असलेली वाहने तातडीने दुरुस्त करण्याची सूचना केली आहे.

जुने गांधीनगर येथील परिस्थिती पाहून अधिकाऱ्यांना धरले धारेवर

Advertisement

वडगाव येथील विभागीय कार्यालयात जाऊन पाहणी केली. तेथे असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट तसेच इतर साहित्य वापरण्याची सूचना त्यांनी केली. त्यानंतर जुना पी. बी. रोड, नरगुंदकर भावे चौक यासह विविध ठिकाणी भेट देऊन तेथील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पावले उचला, असे त्यांनी स्पष्ट केले. जुने गांधीनगर येथे तर परिस्थिती पाहून त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. सर्वत्र चिखल कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले होते. त्यामुळे अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. शहरातील तसेच उपनगरातील लहान नाले आहेत, त्याची दुरुस्ती करण्यासाठी योग्य नियोजन करा, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.

औषधांची फवारणीची ताकीद

दरम्यान, महत्त्वाचे म्हणजे सध्या साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागात औषधांची पुन्हा फवारणी करावी, अशी सक्त ताकीद त्यांनी आरोग्य विभागाला दिली आहे. डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यासारख्या साथीच्या आजारांना आळा घालायचा असेल तर स्वच्छता तसेच औषध फवारणी महत्त्वाची आहे. त्यासाठी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नियोजन करून प्रत्येक प्रभागात औषध फवारणी करण्यासाठी पावले उचलावीत, असे स्पष्ट केले. यावेळी त्यांच्यासोबत पर्यावरण विभागाचे अभियंते हणमंत कलादगी, आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

भुयारी मार्गातील पाणी उपसा करा

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या भुयारी मार्गामध्ये पावसामुळे पाणी साचून आहे. त्या पाण्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली होती. तसेच डासांचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे त्या ठिकाणीही मनपा आयुक्तांनी भेट देऊन तेथील पाण्याचा उपसा तातडीने करावा, अशी सूचना केली आहे.

Advertisement
Tags :

.