For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नंदनवनावर काळी छाया

06:51 AM Apr 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
नंदनवनावर काळी छाया
Advertisement

जम्मू काश्मीरमधील पहलगामवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत अॅक्शन मोडवर आला असून, सर्व स्तरातून पाकिस्तानची कोंडी करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. हे बघता पुढच्या काही दिवसांमध्ये या दोन देशांमध्ये राजनैतिक पातळीवरील युद्ध पहायला मिळण्याची चिन्हे दिसतात. जिथे हल्ला झाला, ते पहलगाममधील बैसरन खोरे हे मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखले जाते. हे पाहता तेथे अधिकची सुरक्षाव्यवस्था असणे आवश्यक होते. परंतु, सुरक्षेच्या पातळीवर याठिकाणी गंभीर चूक झाली, याची कबुली स्वत: केंद्र सरकारने दिली, हे बरे झाले. किंबहुना, हा देशाच्या ऐक्याचा व सुरक्षेचा विषय असल्याने या मुद्द्यावर कोणत्याही पक्षाने दुसऱ्या पक्षावर टीका न करण्याची सर्वपक्षीय बैठकीत घेतलेली भूमिका स्वागतार्ह होय. खरे तर काँग्रेससह सर्वच पक्षांनी सरकारच्या निर्णयांना पाठिंबा दर्शविला आहे. हे बघता आगामी काळात मोदी सरकार काय पावले उचलणार, याकडे देशाचे लक्ष असेल. या हल्ल्यात जवळपास 26 पर्यटकांचा मृत्यू झाला असून, जम्मू काश्मीरमधील पर्यटन संस्कृतीलाच याने हादरा दिला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पहायला मिळते. पहलगामवर हल्ला करणाऱ्यांना पाताळातूनही शोधून काढू, असा इशारा मोदी यांनी दहशतवाद्यांना दिला आहे. याशिवाय उरलेसुरले अस्तित्व उद्ध्वस्त करण्याची हीच योग्य वेळ असल्याकडेही लक्ष्य वेधले आहे. म्हणूनच पाकविरोधात कठोर भूमिका अपेक्षित असेल. सिंधू नदीचे पाणी रोखण्याचा निर्णय घेऊन भारताने याआधीच पाकला दणका दिला आहे. परंतु, त्यालाही युद्धसदृश कृती असे संबोधन लावणे, हा पाकिस्तानचा कांगावखोरपणाच म्हणता येईल. याशिवाय सिमला, व्यापार करारासह द्विपक्षीय कराराला स्थगिती देणे, भारताच्या विमानांना पाकिस्तानी हवाई हद्द बंद करणे, यातून या शेजारी देशाने आपला मूळ पिंडच पुन्हा एकदा दाखवून दिला आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये तीन मोठी युद्धे झाली. यातील 1947, 1965 व 1971 या तिन्ही युद्धात भारताने पाकला धूळ चारली. परंतु, तरीही युद्धाची खुमखुमी कमी होईल, तर तो पाकिस्तान कसला. त्यानंतरही कारगीलसह अन्य छोट्या मोठ्या लढायातून या देशाने आपले उपद्रवमूल्य दाखवूनच दिले आहे. दहशतवाद्यांना तयार करणे व पोसणे, हा तर या राष्ट्राचा सर्वांत आवडता उद्योग. आज ही भूमी केवळ दहशतवादाच्या पिकासाठी ओळखली जाते, यातच सारे आले. अर्थात या सगळ्या युद्खोरपणात या देशाच्या अर्थव्यवस्थेचे पार वाटोळे झाले आहे. एक राष्ट्र म्हणून आजपर्यंत पाकिस्तान कधीच ताठ पायाने उभा राहू शकलेला नाही. या देशाला कधी ना राजकीय स्थैर्य मिळाले ना आर्थिक. त्याला कारणीभूत येथील दहशतवादी मानसिकताच आहे. तथापि, यातून अजूनही हे राष्ट्र धडा घ्यायला तयार नाही. तसे पाहिल्यास अलीकडे या देशाला अमेरिकेकडून मिळणाऱ्या निधीत कपात करण्यात आली आहे. तसा विचार केला, तर पाकिस्तानकडे स्वत:चे असे काहीच नाही. अमेरिका, चीन यांसारख्या देशांच्या तुकड्यांवरच कसेबसे येथील अर्थकारण चालले आहे. पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी थेट अमेरिकेमुळेच आम्हाला अशा गोष्टी कराव्या लागतात, असे म्हटले आहे. हे विधान गंभीरच ठरावे. मागच्या काही वर्षांमध्ये दहशतवादाची झळ ही संपूर्ण जगाला बसली आहे. हे पाहता दहशतवादाबाबत अमेरिका, चीनसह सगळ्याच देशांनी कडक भूमिका घ्यायला हवी. दहशतवादाला छुपा पाठिंबा देणे, ही बाब अंतिमत: सगळ्या जगाकरिता विनाशकारक ठरू शकते, हे त्यांनी ध्यानात घ्यावे. पाकिस्तानमध्ये सध्या प्रचंड राजकीय अस्थिरता आहे. बलुचिस्तानमधील बंडखोरांच्या कारवायांनी या देशाला ग्रासले आहे. अशा परिस्थितीत भारतातील पहलगामसारख्या जगप्रसिद्ध पर्यटनस्थळावर हल्ला करून सगळे लक्ष त्याकडे वेधण्याचा पाकचा डाव असू शकतो. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर हेच यामागचे प्रमुख सूत्रधार असल्याचे आरोप आता दस्तुरखुद्द पाकिस्तानमधूनच होत आहेत. पाकिस्तानातील प्रसिद्ध पत्रकार आदिल राजा यांनीच असे आरोप केले आहेत. मागच्या काही दिवसांत अनेक कारणांमुळे मुनीर हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. अगदी माजी पंतप्रधान इम्रान खान यांनीही त्यांच्यावर हत्येच्या कटाचे आरोप केले आहेत. तसेच माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप मागे घेण्याच्या बदल्यात मुनीर व शरीफ यांच्यात समझोता झाल्याचेही इम्रान खान यांनी म्हटले हेते. याशिवाय न्यायव्यवस्थेत हस्तक्षेप केल्याचाही मुनीर यांच्यावर ठपका आहे. दुसऱ्या बाजूला हेच मुनीर द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत उगाळत बसतात. हिंदू व मुस्लिम हे धर्म, विचार, परंपरा या पातळीवर कसे वेगळे आहेत, हे सांगतात आणि पाकिस्तानातील पुढच्या पिढ्यांपर्यंत आपल्याला काय पोहोचवायचे आहे, हे स्पष्ट करतात. यातून दुसरे तिसरे काही नव्हे, तर त्यांचा भारतद्वेषच अधोरेखित होतो. वास्तविक, पाहता आजचा पाकिस्तान हा सर्व बाजूने कोसळलेला आहे. अशा स्थितीत आगळीक करणे, हा या देशाचा इतिहासच राहिला आहे. हे पाहता सर्व दृष्टीने आपल्याला तयार रहावे लागेल. भारताच्या तिन्ही दलांना डोळ्यात तेल घालून सीमांचे रक्षण करावे लागेल. काळानुसार युद्धाचे प्रकार बदलले आहेत. आज राजनैतिक पातळीवरचे युद्ध हे अतिशय महत्त्वाचे मानले जाते. म्हणूनच पुढच्या काही दिवसांत या पातळीवर पाकिस्तानची जिथे तिथे कोंडी कशी करता येईल, यावर भारताने भर द्यायला हवा. चीनची पाकिस्तानबद्दलची सहानुभूती कधीच लपून राहिलेली नाही. तर अमेरिकेच्या दुटप्पी भूमिकेचाही आपण वारंवार अनुभव घेतला आहे. असे असले, तरी दहशतवादाचा मुद्दा ठळकपणे समोर ठेऊन आपल्याला पाकिस्तानच्या आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करता येईल. तसेच त्याकामी इतर देशांचीही मदत घेता येईल. बाकी काही असो. पण, आता या कुरापतखोर शेजाऱ्याला कायमचा धडा शिकवण्याची वेळ आली आहे, हे नक्की.

Advertisement

Advertisement
Tags :

.