वयोवृद्ध-दिव्यांग पेन्शनधारक अडचणीत
मासिक पेन्शन ठप्प : सुरळीत करण्याची मागणी
बेळगाव : वयोवृद्ध, विधवा, दिव्यांग आणि निराधार लाभार्थ्यांची पेन्शन थांबली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांसमोर अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी देण्यात येणारी पेन्शनच थांबविल्याने लाभार्थ्यांना उदरनिर्वाहासाठी दुसऱ्याकडे हात पसरण्याची वेळ आली आहे. शिवाय निवडणुकीमुळे शासकीय कार्यालयात पेन्शनसंबंधी चौकशी करणेही कठीण झाले आहे. त्यामुळे पेन्शन लाभार्थी वाऱ्यावर पडले आहेत. जिल्ह्यात वयोवृद्ध, विधवा, दिव्यांग आणि निराधार, लाभार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, काही लाभार्थ्यांची मासिक पेन्शन थांबविण्यात आली आहे. अचानक पेन्शन कशासाठी थांबविण्यात आली आहे, असा प्रश्नही लाभार्थ्यांतून विचारला जात आहे. निवडणुकीच्या काळात लाभार्थ्यांची पेन्शन थांबविण्यात आल्याने संताप व्यक्त होऊ लागला आहे. एकीकडे उमेदवारांकडून आश्वासनाचा पाऊस पाडला जात आहे. तर दुसरीकडे मात्र हक्काच्या पेन्शनपासून लाभार्थ्यांना दूर रहावे लागत आहे. या प्रकाराबाबत लाभार्थ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. 60 वर्षांवरील वयोवृद्ध लाभार्थ्यांना मासिक पेन्शन दिली जात आहे. त्याबरोबर दिव्यांग आणि विधवा महिलांना पेन्शन दिली जाते. मात्र मागील दोन-चार महिन्यांपासून काही लाभार्थ्यांची पेन्शन ठप्प झाली आहे. मात्र पेन्शन कशासाठी थांबविण्यात आली आहे. हे मात्र लाभार्थ्यांना समजेनासे झाले आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनात अडचणी येऊ लागल्या आहेत. निवडणुकीमुळे शासकीय कार्यालयात पेन्शनसंबंधी चौकशी करणेही अडचणीचे ठरु लागले आहे. त्यामुळे पेन्शनसाठी आता काय करावे, असा प्रश्नही लाभार्थ्यांसमोर पडला आहे. दिवसेंदिवस महागाई झपाट्याने वाढू लागली आहे. दैनंदिन वस्तूच्या दरात वाढ झाली आहे. त्यातच मासिक पेन्शन ठप्प झाल्याने दैनंदिन जीवन जगणे असह्या होऊ लागले आहे. प्रशासनाने लाभार्थ्यांची पेन्शन सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे.