देवा, तुमच्या उपदेशामुळे मी स्वानंदात निमग्न आहे
अध्याय एकोणतिसावा
उद्धव म्हणाला, देवा, तुम्ही माझ्यावर पूर्ण कृपा केलीत आणि माझे भवबंधन तोडून टाकलेत. तुमच्या उपदेशाचा छिन्नी हातोडा चालवून माझ्यातल्या आत्मस्वरुपाला प्रकट होण्यासाठी तुम्ही काय काय केलेत ते आता सांगतो. माझा जन्म यादव कुळात झाला. वृष्णि, अंधक, सात्वत इत्यादि नातेवाईक मला लाभले. नातेवाईक, पत्नी, मुले, ह्यांच्या प्रेमाच्या पाशात मी इतरांप्रमाणेच गुंतलो होतो. ते स्नेहपाश तुम्ही तोडून टाकलेत. त्यामुळे तुमचे ध्यान मला लागले. माझ्या हेही तुम्ही लक्षात आणून दिलेत की, तुमच्या अधीन असलेली तुमची माया तोडायला अत्यंत कठीण असलेल्या स्नेहपाशात लोकांना घट्ट बांधून ठेवल्याचे भासवते. भासवते असे म्हणण्याचे कारण म्हणजे माणसाची खरी ओळख आत्मतत्व हीच असताना तो ती विसरतो म्हणून त्याला आपण स्नेहमायेने बांधले गेलो आहोत असा भास होतो. माझ्या बाबतीतले हे स्नेहमायेचे बंधन तुम्ही माझ्यावर कृपा करून आधीच नाहीसे करून टाकले आहेत. एव्हढेच नव्हे तर माणसाचे भवबंधन तोडण्यासाठी तुमच्या हातात असलेले शस्त्र म्हणजे तुमची भक्ती वाढवण्याची युक्ती. ते सतेज होण्यासाठी त्या शस्त्राला धार लावून ते मला अर्पण केलेत. आता तुम्ही मला दिलेल्या शस्त्राचा वापर करून मी जगाचे भवबंधन तुमच्या आशीर्वादाने तोडून टाकू शकीन एव्हढी असीम कृपा तुम्ही माझ्यावर केली आहेत. कुठल्याही दृष्टीकोनातून बघितलं तरी हा संसार दु:खरूपच आहे. तेव्हा त्यातील आपले कर्तव्य पार पाडले की, निरपेक्षपणे त्यातून बाजूला होण्यातच शहाणपणा आहे हे तुमच्या कृपेने मला समजले त्यामुळे तो माझ्यासाठी सुखरूप झाला. माझ्या बाबतीत हा बदल झाल्याने तुम्ही माझा निश्चित उद्धार केला आहे हे माझ्या लक्षात आले. मी आता कृतकृत्य झालो आहे. देवांची स्तुती करताना तो पुढे म्हणाला, जे अशक्य असते ते तुम्ही शक्य करून दाखवता. तुमच्या निजमायेला तुमच्या कह्यात ठेवता तिचा महिमा काय वर्णावा? तिच्यावर ताबा मिळवणे योगी मंडळींनाही अत्यंत कठीण असते. प्रत्यक्ष शंकरालाही तिने अडचणीत आणले ती माया तुमची दासी आहे. तुम्ही खरोखरच परात्पर महायोगी आहात. तुमच्या कृपेमुळे मी कृतकृत्य झालो. आता मला ना संसाराचे दु:ख वाटतं ना भविष्याची भीती. मी आता सर्वदा स्वानंदी निमग्न असतो. माझ्या दृष्टीने आता दृश्य द्रष्टा आणि दर्शन ही त्रिपुटी राहिली नाही तसेच माझ्या दृष्टीने त्रिगुणांचे महत्त्वही संपुष्टात आले. माझे मी तू पण संपले आणि तुमच्याशी अद्वैत साधले गेले. मी आता तुमच्या उपदेशामुळे स्वानंदात निमग्न आहे. अर्थात मी आता स्वानंदात निमग्न आहे असे बोलणेही व्यर्थ आहे कारण ह्यात मी आणि स्वानंद हे वेगवेगळे आहेत असे वाटते. प्रत्यक्षात माझे अस्तित्वच आता राहिले नसून केवळ स्वानंद शिल्लक राहिला आहे. आता मला माझे असे कोणतेही कार्य, कारण, कर्तव्यता अशी उरली नाही. थोडक्यात आता स्वत:हून काही करावे असे कोणतेही कर्तव्य आता मला उरले नाही. उद्धव आता संपूर्ण समाधानी झाला आहे असे भगवंताना वाटू लागले. एव्हढ्यातच उद्धवाने त्यांचे पाय धरले आणि म्हणाला, देवा श्रीकृष्णनाथा आता मी तुमच्याकडे एक मागणे मागणार आहे ते कृपा करून मला द्यावे. उद्धवाला आणखीही काही हवे आहे हे पाहून देवांना आश्चर्य वाटत असतानाच उद्धव पुढे म्हणाला, ज्याप्रमाणे बालक कळवळून रडू लागले, एखादी गोष्ट हवी म्हणून हट्ट करू लागले की, मातेला त्याची दया येते आणि ती त्याचे हट्ट पुरवते. त्याप्रमाणे देवा श्रीकृष्णराया माझे मागणे पूरवा म्हणून मी आपल्याकडे हट्ट करत आहे. हे माझे शेवटचे मागणे आपण लक्ष देऊन ऐकावे अशी माझी नम्र विनंती आपल्याकडे आहे. आता उद्धव काय मागतो ह्याचे मोठे कुतूहल भगवंताना वाटत होते