मोकाट जनावरांची संख्या अधिक असल्याने पकडणे अवघड
लम्पीस्कीन झालेली जनावरे सोडल्याने समस्या : बाजारपेठेमध्ये व्यावसायिकांची गैरसोय
बेळगाव : मोकाट जनावरांविरोधात महानगरपालिकेने मोहीम राबविली तरी जनावरांची संख्या अधिक असल्याने ही मोहीम यशस्वी होणे अवघड आहे. 800 हून अधिक जनावरे सध्या विविध ठिकाणी फिरत आहेत. काही जनावरांचे मालक दिवसभर जनावरे सोडून जातात. मात्र ही जनावरे वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. तसेच बाजारपेठेमध्ये व्यावसायिकांना त्रासिक ठरत आहेत. याबाबत अनेकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तरी देखील मोकाट जनावरे अधिक प्रमाणात सोडली जात असल्याचे राजू संकण्णावर यांनी सांगितले. गेल्या काही दिवसामध्ये जनावरे पकडण्याची मोहीम हाती घेतली तरी जनावरांची संख्या वाढतच चालली आहे. शहरालगत असलेल्या उपनगरांमधून शहराकडे जनावरे मोठ्या संख्येने येत असतात. ध. संभाजी चौक, कॅम्प, हुतात्मा चौक, शनिवार खूट, टिळक चौक, गणपत गल्ली, रविवार पेठ याठिकाणी जनावरे रस्त्यावरच बसून राहात आहेत. नागरिक तक्रार करत आहेत. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात जनावरे पकडणे अवघड असल्याचे राजू संकण्णावर यांनी सांगितले.
लम्पीस्कीन जनावरे न सोडण्याचे आवाहन
दरम्यान आजाराने त्रस्त झालेली जनावरे सोडून देण्याचे प्रकार वाढले आहेत. लम्पीस्कीनसारख्या आजारावर उपचार करणे अशक्य होते. परिणामी काही मालक जनावरे तशीच रस्त्यावर सोडून देत आहेत. आतापर्यंत 7 जनावरे लम्पीस्कीन झालेली पकडून उपचार करण्यात आले आहेत. मात्र हा आजार इतर जनावरांना लागू शकतो. तेव्हा कोणीही अशाप्रकारे लम्पीस्कीन झालेली जनावरे सोडून नयेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.