For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आता चर्चा गट-गणांची

01:14 PM May 13, 2025 IST | Radhika Patil
आता चर्चा गट गणांची
Advertisement

कोल्हापूर :

Advertisement

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाबाबत निकाल दिल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला हिरवा कंदील मिळाला आहे. निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या 67 आणि पंचायत समितीच्या 134 मतदारसंघांची संख्या जुनीच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, या निवडणुकीतील आरक्षणाच्या बदलांवर आता सर्वांचे लक्ष लागले असून, गट-गणांच्या चर्चेला वेग आला आहे.

ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यामुळे या निवडणुका रखडल्या होत्या. जिल्हा परिषदेच्या मावळत्या सभागृहाची मुदत जून 2022 मध्येच संपली होती. मागील अडीच-तीन वर्षापासून जिल्हापरिषदेत प्रशासकीय राज सुरू आहे.

Advertisement

न्यायालयाच्या निर्णयानंतर आता पुढील चार महिन्यात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होईल. कोल्हापूर जिह्यातील ग्रामीण भागात पावसाचा जोर कायम असतो. त्यामुळे पावसाळ्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होवून साधारण ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकांचा बिगुल वाजेल. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील संभाव्य लढती कशा असतील. महायुती आणि महाविकास आघाडीतील सहा प्रमुख पक्षांची भूमीका कशी असेल ? कोण नेता कोणत्या पक्षातून लढेल. नेत्यांची भूमीका काय असेल ? अशा गावगप्पा रंगल्या आहेत. यामध्ये सर्वभागात असलेली एकसमान चर्चा म्हणजे “आमचा मतदारसंघ पूर्वी कशासाठी आरक्षित होता आणि आता कशासाठी राहील ? ही लक्षवेधी चर्चा ग्रामीण भागात आहे.

  • जिल्हा परिषदेची रचना आणि आरक्षण

जिल्हा परिषदेचे एकूण 67 मतदारसंघ आहेत, तर पंचायत समितीचे 134 मतदारसंघ आहेत. मावळत्या सभागृहातील आरक्षणानुसार, सर्वसाधारण खुला प्रवर्गासाठी 39, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 18, अनुसूचित जातींसाठी 9 आणि अनुसूचित जमातींसाठी 1 मतदारसंघ आरक्षित होता. आगामी निवडणुकीतही हीच पद्धत कायम राहण्याची दाट शक्यता आहे. काही ठिकाणी आरक्षणात बदल होण्याचे संकेत आहेत. हे बदल नेमके कसे असतील याबाबतचे आडाखे आतापासूनच बांधले जाऊ लागले आहेत.

  • सर्वसाधारण खुला प्रवर्ग

सर्वसाधारण खुल्या प्रवर्गात शित्तूर तर्फ वारुण, सातवे, कोतोली, कळे, रेंडाळ, नांदणी, दतवाड, कसबा सांगाव, सिद्धनेर्ली, बोरवडे, परिते, तिसंगी, आसळज, राशिवडे बुद्रूक, आकुर्डे, उत्तूर, नेसरी, चंदगड, माणगाव यांचा समावेश आहे, हे खुले प्रर्वग असेच राहतील असे सुत्रांचे म्हणणे आहे.

  • महिलांसाठी आरक्षित मतदारसंघ

महिलांसाठी आरक्षित मतदारसंघांमध्ये पोर्ले तर्फ ठाणे (ओबीसी), यवलूज (सर्वसाधारण), घुणकी (अनुसूचित जाती), भादोले (ओबीसी), शिरोली (सर्वसाधारण), रुकडी (सर्वसाधारण), कबनूर (ओबीसी), पट्टणकोडोली (ओबीसी), हुपरी (ओबीसी), दानोळी (सर्वसाधारण), उदगाव (अनुसूचित जाती), आलास (ओबीसी), नानीबाई चिखली (सर्वसाधारण), कापशी सेनापती (सर्वसाधारण), शिये (अनुसूचित जाती), वडणगे (अनुसूचित जाती), मुडशिंगी (सर्वसाधारण), उजळाईवाडी (सर्वसाधारण), पाचगाव (अनुसूचित जाती), शिंगणापूर (सर्वसाधारण), सडोली खालसा (सर्वसाधारण), निगवे खालसा (सर्वसाधारण), कसबा वाळवे (ओबीसी), सरवडे (ओबीसी), राधानगरी (सर्वसाधारण), गारगोटी (सर्वसाधारण), पिंपळगाव (सर्वसाधारण), कडगाव (सर्वसाधारण), कोळिंद्रे (सर्वसाधारण), बड्याचीवाडी (सर्वसाधारण), हलकर्णी (सर्वसाधारण), भडगाव (सर्वसाधारण), तुडये (सर्वसाधारण) यांचा समावेश आहे.

  • नागरिकांचा मागास प्रवर्ग

नागरिकांच्या मागास प्रवर्गात सरूड, पिशवी, करंजफेण, कुंभोज, हातकणंगले, कोरोची, कौलव, आजरा, गिजवणे, तुर्केवाडी यांचा समावेश आहे. तर अनुसूचित जाती आणि जमात, अनुसूचित जातींसाठी कोडोली, उचगाव आणि सांगरूळ हे मतदारसंघ आरक्षित आहेत, तर अनुसूचित जमातीसाठी अब्दुललाट हा मतदारसंघ आरक्षित आहे.

  • निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू

निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झाला नसला तरी गट-गणांमध्ये जोरदार तयारी सुरू झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणता मतदारसंघ कशासाठी आरक्षित होईल, याबाबत उत्सुकता आहे. या निवडणुकीत आरक्षणाच्या बदलांमुळे राजकीय समीकरणेही बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात आणि कोणते नवे चेहरे समोर येतात, यावर उमेदवारीचा चेहरा ठरणार आहे. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने अपक्षांची संख्याही वाढणार आहे. यामुळे आतापासून संभाव्य मतदार संघ हेरून एका पेक्षा अधिक मतदार संघात इच्छुकांनी पेरणी सुरू केली आहे.

Advertisement
Tags :

.